यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त बोथबोडन या गावात शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सिंचन प्रकल्प तयार करण्याची आवश्यकता असून गावकरी त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. या प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांना अतिशय तोकडा मोबदला मिळाला. यामुळे गावाच्या स्मशानभूमी परिसरात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी कुणीही तयार नाही. हे दोन प्रकल्प वेळेत पूर्ण केले तर बोथबोडनच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होणार आहे. तरच येथील आत्महत्याही थांबू शकते, असा आशावाद येथील ग्रामस्थांना आहे. बोथबोडन हे गाव २००७ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री मनीशंकर अय्यर यांच्या भेटीने चर्चेत आले. त्यानंतर श्रीश्री रविशंकर यांनी तब्बल १५ दिवस येथे योग शिबिर व श्रमदानाचे कार्यक्रम राबविले. प्रत्येकाच्या शेतात खड्डा खोदण्यात आला. काही मोजक्या शेतकऱ्यांनी या खड्ड्याला विहिरीत रुपांतर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या व्यतिरिक्त या खड्ड्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. बोथबोडनमध्ये १८ जुलै २००८ रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिली. तेथूनच गावात मदतीचा ओघ सुरू झाला. गरज भासल्यास स्थानिक काँग्रेस आमदार व खासदारांशी संपर्क करण्यास त्यांनी सांगितले. शेतकरी विधवांशी चर्चा केली. त्यांच्याकडे स्वत:चा मोबाईल क्रमांक दिला. गावातील कॅन्सर रुग्ण सुरेश नानकचंद छत्ताणी यांनी मदतीसाठी कॉल केल्यानंतर राहुल गांधींकडून त्यांना उपचारासाठी मदतही मिळाली. याशिवाय नागपूर येथील सिन्हा, माथूर, कपूर या बड्या आसामींनी बोथबोडन येथे येऊन मदत केली. यावेळी गावातील दुफळीमुळे योग्य विकास आराखडा त्यांच्याकडे सादर करता आला नाही, अशी खंतही ग्रामस्थांकडूनच व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मदतीतून पंजाब जाधव, नरसिंग राठोड, बाबूलाल पवार यांना प्रत्येकी साडेतीन लाखांची मदत करण्यात आली. त्यांनी शेतात मोटारपंप व विहिरी खोदून सिंचन सुरू केले आहे. याशिवाय गावात शासनाकडून २५० दुधाळ जनावरे वितरित करण्यात आली. त्यापैकी केवळ २५ टक्के लाभार्थ्यांनी ही जनावरे जोपासली. आज त्यांची स्थिती समाधानकारक आहे. ज्यांनी जनावरे मिळताच विकून टाकली त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, असेही येथील ग्रामस्थ कबूल करतात. शिवसेनेचे आमदार संजय राठोड व दिवाकर रावते यांनी गावात येवून दिवाळी साजरी केली. त्यानंतर निवडणूक काळात आमदार मदन येरावार यांनी येथे पायधूळ झाडली, एवढेच युतीचे योगदान.६० वर्षीय शेतकऱ्याने केली आत्महत्याबोथबोडन येथील आनंदा कनिराम राठोड (६०) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्याकडे पाच एकर शेती असून बँकेचे कर्ज आहे. यावरून गावातील आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते.सामाजिक ऐक्याची गरज गावात सामाजिक एकवाक्यता निर्माण करण्याची गरज आहे. परिस्थितीशी झगडत असलेले कुटुंब आणि शेतकरी आत्महत्या झालेले कुटुंब असे सरळ दोन गट येथे पहायला मिळते. गावात एकवाक्यता आणणे हेच सर्वात मोठे आव्हान हेच असल्याचे येथील माजी सरपंच अनुप चव्हाण यांनी सांगितले.
बोथबोडन येथे हवा सिंचन प्रकल्प
By admin | Updated: July 18, 2015 02:15 IST