भिस्त चापडोहवर : पाणी चार दिवसाआड होण्याची शक्यतायवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाच्या मृत साठ्यातही ५० टक्याने घट झाली असून त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. अशा परिस्थितीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यात आहे. शहराची संपूर्ण भिस्त आता चापडोह प्रकल्पावर आहे.वाढत्या तापमानाने शहराला निळोणा प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने घसरण होत आहे. सध्या धरणातील मृत साठ्यावर शहराचा पाणीपुरवठा अवंबून आहे. मात्र आता मृत साठ्यातही प्रचंड घट होत आहे. गेल्या काही दिवसात हा साठा निम्यावर आला आहे. गत १५ दिवसात ही अवस्था निर्माण झाल्याने सोमवार ९ मे रोजी पाणी साठा मोजला जाणार आहे. त्यानंतर पावसाळ्यापर्यंत पाणी कसे पुरविता येईल यासाठी वेळापत्रक तयार केले जाणार आहे. धरणातील पाण्याचे तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे जलसाठा दररोज दोन इंचाने कमी होत आहे. पावसाळा लांबल्यास शहराची संपूर्ण भिस्त चापडोहवरच राहणार आहे. चापडोह प्रकल्पात सध्या साठवण क्षमतेच्या ४० टक्के पाणी आहे. चार ते पाच महिने पाणी पुरेल इतका हा साठा आहे. मात्र यासाठी आवश्यक जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने पाणी उपसणे शक्य नाही. धरणातील पाणी पातळीचा अभ्यास करण्यासाठी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर सोमवारी पाहणी करणार आहे. त्यानंतर चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेणार आहेत. (शहर वार्ताहर)
निळोणाच्या मृतसाठ्यात ५० टक्के घट
By admin | Updated: May 5, 2016 02:31 IST