विशेष समाज कल्याण : कामे रखडली, पावसाळ्यामुळे पुन्हा प्रतीक्षा यवतमाळ : शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाला तांडावस्तीच्या विकासासाठी पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहे. मात्र त्यातील कामांची मंजुरी देण्यास हेतुपुरस्सर टाळले जात असल्याचा सूर आहे. प्रत्येक वेळी ‘तारीख पे तारीख’ देऊन लोकप्रतिनिधींनाही फिरविले जात आहे. जिल्ह्यात तांडावस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तांड्यांच्या विकासासाठी शासनाने पाच कोटी रुपये जिल्ह्याला पाठविले आहे. विशेष समाज कल्याण विभागामार्फत हा निधी खर्च केला जातो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हेतुपुरस्सर या निधीतील प्रस्तावांना मंजुरी देणे टाळले जात आहे. समाज कल्याण अधिकाऱ्याकडून प्रत्येक वेळी तांत्रिक तर कधी समितीचा आडोसा घेऊन वेळ मारुन नेली जात आहे. लोकप्रतिनिधींनी विचारणा केल्यास ‘आज करतो, उद्या करतो’ अशी उत्तरे दिली जातात. मात्र प्रत्यक्षात या अधिकाऱ्याचा आज-उद्या अद्यापही निघालेला नाही. पर्यायाने पाच कोटींचा निधी समाज कल्याण विभागाच्या तिजोरीत पडून आहे. वास्तविक आतापर्यंत तांडा वस्तीच्या विकासाची कामे पावसाळ्यापूर्वीच मार्गी लागणे गरजेचे होते. आता मंजुरी झाली तरी ऐन पावसाळ्यात कामे करायची कशी असा प्रश्न निर्माण होणार आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्यच काय तर आमदारांनाही फिरविण्याचे, वेळ मारून नेण्याचे कसब समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त केल्याचे दिसते. त्यामुळेच की काय तांडा वस्तीचे पाच कोटी रुपये पडून असूनही एकाही आमदाराने ते का खर्च होत नाही, म्हणून आक्रमक भूमिका घेतल्याचे अद्याप ऐकिवात नाही. समाज कल्याणच्या या तांडा वस्तीत विकासासाठी स्वतंत्र समिती आहे. परंतु युती शासनाने त्याचे अध्यक्ष नियुक्त केलेले नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत. नेमके हेच कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे. पाच कोटींचा हा निधी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यामागे ‘टक्केवारी’चे गणित असल्याची चर्चा समाज कल्याण विभागात आहे. (प्रतिनिधी)
तांडावस्ती विकासाचे पाच कोटी मिळूनही ‘तारीख पे तारीख’
By admin | Updated: June 11, 2016 02:46 IST