१९८० सुरुवात : दहा देशांतून भ्रमंतीयवतमाळ : विश्वशांतीच्या संदेश घेऊन ३० जुलै १९८० मध्ये सुरू केलेली पदयात्रा अजूनही चालूच आहे. या पदयात्रेचा विश्वकीर्तीमान झाला असून ग्रिनीज बुक आॅफ रेकॉर्ड आणि लिम्बा बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड सलग सात वेळा या पदयात्रेला मिळाला आहे. आता ही पदयात्रा शेवटच्या टप्प्यात असून तीन लाख पाच हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. आता ४५ हजार किलोमीटरचे उद्दीष्ट बाकी आहे. या प्रवासादरम्यान तब्बल दहा देशातून भ्रमंती केल्याचे अवध बिहारीलाल यांनी पत्रपरिषदेतून सांगितले. अवध बिहारीलाल आज हे ४९ वर्षाचे आहे. त्यांनी २३ व्या वर्षी पदयात्रेला सुरुवात केली. इंदिरा गांधी यांनी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या भारत व नेपाळच्या सीमेवरील गावातून पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविली होती. तेव्हापासून ही पदयात्रा अविरतपणे सुरू आहे, आता तब्बल २० जणांची टीम तुकड्या तुकड्याने मार्गक्रमण करीत आहे. यात्रेतील प्रवासदरम्यान अशोककुमार या ३६ वर्षीय युवकाचा कावीळच्या आजाराने मृत्यू झाला. तर दोघांची दृष्टी गेली. त्यानंतरही ही यात्रा सुरूच राहणार आहे. आतापर्यंत बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, ब्रम्हदेश, चीन, थायलंड, अफगानिस्तान या देशातून पर्यावरण, शिक्षा, जलसंरक्षण, लोकसंख्या नियंत्रण, कन्याभ्रूण हत्या, विश्वशांती, महिला सक्षमीकरण असे संदेश देत ही यात्रा सुरू आहे. भारतातील गावखेड्यातून जाताना केंद्र सरकारच्या ११०० योजनांची माहिती दिली जाते. आतापर्यंत तीन कोटी २० लाख वृक्षांचे रोपण केले आहे. यात्रेत अनेक कडू-गोड अनुभव आल्याचेही सांगितले. वयाच्या ११ व्या वर्षी महेंद्र प्रताप यांनी यात्रेला सुरुवात केली तर जितेंद्र प्रताप यांनी वयाच्या १३ व्या वर्षी यात्रेत सहभाग घेतला. यात्रेतील प्रत्येक सहभागी व्यक्तीने कुटुंबात परत न जाण्याचा संकल्प केला आहे. यातील प्रत्येक जण अविवाहित राहणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी देहदानाचाही संकल्प घेतला आहे. आता ही यात्रा यवतमाळवरून अमरावती, औरंगाबाद आणि मुंबईला जाणार आहे. पुढील पाच वर्षात ४५ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे. एका दिवशी ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. सोबत कुठेही साहित्य नसते. आहारावर नियंत्रण, तुळस, कडूनिंब आणि बेलांच्या पानांचे सेवन हीच त्यांची औषधी आहे. सकाळी ५ वाजता योगा करून यात्रेला प्रारंभ होतो. सायंकाळी मुक्काम असा दिनक्रम असल्याचे अवध बिहारीलाल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जितेंद्र प्रताप आणि महेंद्र प्रताप, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
विश्वशांतीचा संदेश घेऊन सलग २६ वर्षांची पदयात्रा
By admin | Updated: April 28, 2016 02:27 IST