लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाचे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी एक हजार २७८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कळंब ते यवतमाळ दरम्यान दहा पुलांचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती येथे आढावा बैठकीत दिली.वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता चौधर, वनमंत्र्यांचे खासगी सचिव रवींद्र पवार, रेल्वेचे कार्यकारी अभियंता आर.के. धनगर, उपअभियंता एच.एल. कावरे आदी उपस्थित होते.सदर रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यात आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटर असा आहे. यवतमाळ जिल्ह्यात लागणाऱ्या जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसºया टप्प्यात रेल्वेने ९४.२० हेक्टर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाची मागणी केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात खर्च झालेल्या एक हजार २७८ कोटींमधून ८५७ कोटी जमीन अधिग्रहणावर तर उर्वरित रकमेतून १३ मोठे पूल, ७० छोटे पूल, टनल, स्टेशन बिल्डींग, ट्रॅक लिंकिंग आदी कामे करण्यात आल्याचे यावेळी सांगितले.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यावर १३०० कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST