नागरिक संतप्त : सुकळी जहागीर फिडरवर तांत्रिक बिघाड उमरखेड : तालुक्यातील सुकळी जहागीर फिडर अंतर्गत येणाऱ्या १३ गावात दररोज रात्री नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. तांत्रिक बिघाडामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात अंधारात रहाणे कठीण झाल्याने नागरिक संतप्त झाले आहे. वारंवार निवेदने देऊनही वीज वितरण कंपनी मात्र दुर्लक्ष करीत आहे. सुकळी जहागीर फिडर अंतर्गत नागेशवाडी, सुकळी, वरुडबिबी, अमानपूर, मरसूळ, बेलखेड, बहागाव, कुपटी, बारा आणि आमदरी या गावांमध्ये गत सहा-सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एक-दोन दिवस झाले की वीज पुरवठा खंडित होतो. त्यानंतर दुरुस्तीचे नावच घेतले जात नाही. कधी काळी दुरुस्ती केली तर तीही कंत्राटी कामगारांच्या हाताने केली जाते. त्यामुळे या परिसरातील शेकडो नागरिकांना अंधारात रहावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. रात्री अंधारामुळे घराबाहेर पडणेही कठीण होते. याप्रकाराने संतप्त झालेले नागरिक शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला. पावसाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली. यावेळी अरविंद सुरोशे, सुदर्शन सुरोशे, दिगंबर शिंदे, नागेश गोरेवाड, दिगंबर कदम, संभाजी सुरोशे, बालाजी कदम यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी या नागरिकांशी चर्चा करण्याचेही टाळले. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)पुसद तालुक्यातील धोकादायक रोहित्र अपघातास आमंत्रण पुसद : तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी लावण्यात आलेले रोहित्रच आता नागरिकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसात सताड उघड्या रोहित्रांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून महावितरण मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. पुसद तालुक्यात १८९ गावे आहेत. तालुक्यात जवळपास आठशेच्यावर रोहित्र बसविण्यात आले आहे. रोहित्र सुरक्षित राहून वीज पुरवठा सुरळीत व्हावा हा या मागचा उद्देश आहे. यासाठी रोहित्राला लोखंडी जाड पत्र्याची कुलूप बंद पेटी बसविण्यात येते. वीज पुरवठा खंडित झाला किंवा इतर कोणत्याही तांत्रिक कारणामुळे रोहित्रच बिघडले तर कर्मचारी कुलूप उघडून रोहित्राची दुरुस्ती करतात. परंतु सध्या स्थितीत तालुक्यातील बहुतांश रोहित्र सताड उघडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अनेक रोहित्र दाट लोकवस्तीत असून या ठिकाणी लहान मुले नेहमी खेळत असतात. खेळताना रोहित्राच्या ताराला स्पर्श झाल्यास जीवित हानी होण्याची भीती असते. शहरातील उदासीवार्ड, शंकरनगर, गजानन मंदिर परिसर, डुबेवार ले-आऊट, मुखरे चौक, नाईक चौक, नवीन पुसद परिसर, वसंतनगर परिसर, मोतीनगर, गांधीनगर यासह बसस्थानक परिसरातील रोहित्र उघडे दिसून येतात. ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. या रोहित्रांची तत्काळ देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
१३ गावांत दररोज अंधार
By admin | Updated: June 29, 2015 00:24 IST