मंगरूळपीर : कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी शहरात निर्माण करण्यात आलेल्या पोलीस चौक्या नव्याने सुरू करण्याबाबत पोलीस दलात हालचाली गतिमान झाल्या आहेत. लोकमतने बंद असणार्या चौक्यांचा पोस्टमार्टेम केल्यानंतर या चौक्या २८ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी दिली. गत १५ वर्षांपूर्वी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने दोन पोलीस चौक्या सुरू केल्या होत्या. परिणामी, शहरातील गुन्हेगारीचा आलेख नियंत्रणात येऊन चोर्यांचे प्रमाणही कमी झाले होते. परंतु काळाच्या ओघात व मनुष्यबळ कमी झाल्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनने या पोलीस चौक्यांकडे दुर्लक्ष केले होते. शहराच्या बिटमध्ये कर्तव्यावर असणारे बिट जमादार अथवा पोलीस कर्मचारी कधीच या चौक्यांकडे फिरकत नसल्यामुळे चौक्या नेहमीच बंद राहत आहेत. याचा परिणाम, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर झाला असुन शहरवासीयांची डोकेदुखीही वाढली आहे. लोकमतने हाच धागा पकडुन २७ मे च्या अंकात बंद चौक्याचे पोस्टमार्टेम केले. परिणामी, पोलीस दल खळबळून जागे झाले आहे. २८ मे पासून चौक्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
मंगरूळपीरातील पोलिस चौक्या बुधवारपासून सुरू
By admin | Updated: May 28, 2014 00:32 IST