आरोग्य विभागाच्या अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात २२ सप्टेंबरपर्यंत एकूण ४१७४० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी ४१०९९ लोकांनी कोरोनावर मात केली, तर ६३८ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्थातच २२ सप्टेंबर रोजी केवळ दोन कोरोना बाधित उपचाराखाली असल्याचे स्पष्ट होते. कोरोना बाधितांवरील उपचाराचा आरोग्य विभागाकडून निश्चित कालावधीचा विचार करता पूर्वी बाधिताला २७ दिवस रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर हा कालावधी १७ दिवसांवर आला, तर आता लक्षणे सौम्य असल्यास बाधिताला उपचारासाठी किमान १० दिवस रुग्णालयात ठेवून डिस्चार्ज दिला जातो. तथापि, जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून पाच नवे कोरोनाबाधित आढळले असताना २२ सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार केवळ २ व्यक्ती ॲक्टिव्ह अर्थात उपचाराखाली असल्याचे दाखविले जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
०००००००००००००००
कुठे झाली गफलत
आरोग्य विभागाकडून दरदिवशी जिल्हाभरातील नवे बाधित आणि कोरोनामुक्त व्यक्तींच्या आकडेवारीची माहिती घेतली जाते. त्यानंतर ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविली जाते; परंतु गेल्या आठवडाभरापूर्वी संबंधित यंत्रणेकडून माहितीचे संकलन केल्यानंतर ती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडे पाठविताना अचूक पाठविली गेली असावी, असा अंदाज आहे.
०००००००००००००००००
गृहविलगीकरणाच्या माहितीचे संकलन अपूर्ण
अलीकडच्या काळात कोरोना संसर्ग नियंत्रणात असून, नव्या बाधितांतही तीव्र लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना सहसा चार ते पाच दिवस आवश्यकतेनुसार रुग्णालयात ठेवून गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. काही रुग्णांत कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने त्यांना सुरुवातीपासूनच गृहविलगीकरणात ठेवले जाते. नेमकी हीच माहिती पूर्णपणे संकलित झाली नाही.
०००००००००००००००
कोट: आठवडाभरातील बाधितांच्या तुलनेत ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत कशी तफावत झाली किंवा नेमका काय प्रकार आहे त्याची माहिती संंबंधितांकडून घेऊ आणि दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देऊ.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
०००००००००००