वाशिम : इतर सर्व व्यवसाय सुरू असताना शासनाने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे व मंदिरे उघडण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाविक भक्तांसोबतच व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनसेकडून ३१ ऑगस्ट रोजी मध्यमेश्वर मंदिरासमोर आरती करून आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून, मंदिरे उघडण्याचा निर्णय न झाल्यास दर सोमवारी मंदिरासमोर आरती करून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद आहे की, राज्यात सर्वत्र टाळेबंदी शिथिल केल्यानंतर अर्थचक्र सुरू झाले आहे. मात्र, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे व धर्मस्थळे सुरू न झाल्यामुळे या स्थळांशी निगडित पूजनसाहित्य विक्रेते, हार विक्रेते, प्रसाद साहित्य विक्रेते, पूजाअर्चा करणारे पुजारी, आदी घटक बेरोजगार झाले असून त्यांची उपासमार होत आहे. टाळेबंदीमध्ये इतर घटकांना शासनाकडून अर्थसाहाय्य देण्यात येत असून, प्रार्थनास्थळाशी निगडित व्यावसायिक व पुजाऱ्यांना कोणतेही अर्थसाहाय्य देण्यात आले नाही. त्यामुळे या घटकांना किमान ११ हजार रुपये प्रतिकुटुंब अनुदान घोषित करून त्यांना दिलासा द्यावा. यासोबतच प्रार्थनास्थळे खुली करण्याचे आदेश द्यावेत व नागरिकांच्या धार्मिक भावनांचा आदर करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.