इंझोरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अडाण प्रकल्पात अचानक जलसाठा वाढल्याने लघु पाटबंधारे विभागाने हा जलसाठा नियंत्रित करण्याची धडपड सुरू केली आहे. यात गेल्या दोन दिवसांपासून धरणाचे पाचही दरवाजे प्रत्येकी २० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वच नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्प गत महिन्यातच शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पाच्या सांडव्याहून पाण्याचा विसर्ग होत आहे, तर गत तीन दिवसांतील पावसामुळे मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पही ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्याहून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तीन मध्यम प्रकल्पांपैकी सर्वात मोठा असलेल्या अडाण प्रकल्पांतही मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढल्याने धोक्याची घंटा वाजली होती. या पृष्ठभूमीवर यवतमाळ पाटबंधारे विभागाने या प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले आहेत.
------
प्रती सेकंद ११८ घनमीटर पाण्याचा विसर्ग
अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यातील असून, या प्रकल्पाचे नियंत्रण यवतमाळ पाटबंधारे विभागाकडून केले जाते. या प्रकल्पाची लांबी ७५५ मी (२,४७७ फूट), तर उंची ३०.१३ मी (९८.९ फूट) आहे. या प्रकल्पात संदर्भीय जलसाठ्याच्या पातळीपर्यंत पाणी पोहोचल्याने साठा नियंत्रित करण्यासाठी पाचही दरवाजे दोन दिवसांपूर्वी उघडण्यात आले. या पाच दरवाजांतून प्रती सेकंद ११८ घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे.
----------------
अडाण नदी दुथडीवरच
अडाण प्रकल्प हा अडाण नदीवर उभारण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अडाण नदीला पूर आला असून, अद्यापही ही नदी दुथडी भरून वाहत असल्याने प्रकल्पातील जलसाठा नियंत्रित करावा लागत आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचे पाचही दरवाजे तीन दिवसांपूर्वी उघडण्यात आले होते, अशी माहिती लघु पाटबंधारे विभाग यवतमाळकडून देण्यात आली.