वाशिम : राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून, जिल्ह्यातही या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर तापमानात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवारी केले आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे २0१६ पयर्ंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर २२ ते ३१ मे २0१६ या कालावधीत उष्ण लहरी हळूहळू कमी होणार आहेत. उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सकाळी १0 ते सायंकाळी ५ या कालावधीत गरज नसताना उन्हात जाणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास उन्हात जाताना डोक्याला दुपदरी पांढरा रूमाल बांधावा. अंगात शक्यतो काळे व भडक रंगाचे कपडे घालू नये, सैल पांढरे कपडे घालावे, पायात पादत्राणे घालून चालावे. उन्हामध्ये फिरताना थोड्या-थोड्या वेळाने सावलीमध्ये थांबावे. शेतमजूर व वीटभट्टीवर काम करणारे कामगार यांनी सकाळी व दुपारनंतर उशिरा अंगमेहनतीचे काम करावे, तसेच भरपूर पाणी प्यावे व अत्यावश्यक स्थितीत डोक्याला रूमाल बांधून काम करावे, असे आवाहन द्विवेदी यांनी केले. जनावरांना सावलीमध्ये बांधावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
२१ मेपर्यंत उष्णतेची लाट!
By admin | Updated: May 16, 2016 01:20 IST