वाशिम : घरात तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरण्याची सवय प्रत्येकालाच असते. महागाईच्या या काळात तसे करणे चुकीचेदेखील नाही; मात्र हा प्रकार जिवावर बेतू शकतो. खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याने कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारालाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शक्यतोवर तेलाचा पुनर्वापर टाळणेच आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. हाॅटेल्स, टपऱ्यांमध्ये मात्र बिनदिक्कतपणे तेलाचा वारंवार वापर केला जातो. हा कायद्याने गुन्हा असला तरी अन्न प्रशासन विभागाकडून मात्र कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.
स्वयंपाकाचे तेल एकदा वापरले की पुन्हा कधीही वापरू नये, कारण ते खराब व्हायला सुरुवात होते आणि तेलामध्ये ट्रान्स-फॅटी ॲसिडचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषतः थंड तेल पुन्हा गरम करणे टाळायला हवे, कारण त्यात ‘स्मोकिंग पॉईंट्स’ खूप कमी असतात. मोहरीचे तेल, राईस ब्रान ऑइल पुन्हा एकदा वापरता येतात, परंतु तरीही ते टाळण्याचा सल्ला दिला जातो.
................
बॉक्स...
तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक
तळीव पदार्थांसाठी वापर झालेल्या खाद्यतेलात त्यानंतर ‘फ्री रॅडिकल्स’ तयार होतात. त्यामुळे असे तेल दीर्घकाळ वापरणे हानिकारक आहे. फ्री रॅडिकल्स कार्सिनोजेनिक असू शकतात, जे शरीरावर परिणाम करतात. त्यातूनच कोलेस्टेरॉलची समस्या वाढण्याची शक्यता आहे. अनेकांना घशात जळजळ, हृदयाशी संबंधित आजार यासह एखाद्याप्रसंगी कॅन्सरही होऊ शकतो, असे सिद्ध झालेले आहे.
...............
बॉक्स...
रस्त्यावर न खाल्लेलेच बरे
भजी, मुगाचे वडे, समोसा, कचोरी, जिलेबी यासह इतरही अनेक प्रकारचे तळीव पदार्थ रस्त्यावर थाटलेल्या टपऱ्यांवर सहज मिळतात. या पदार्थांसाठी खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जातो. नियमानुसार, हा प्रकार हानिकारक आहे. त्यामुळे रस्त्यावरील टपऱ्यांवर तळीव खाद्यपदार्थ खाण्याचा मोह आवरलेलाच बरा, असे जाणकारांचे मत आहे.
...................
कोट :
हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात
मुळात खाद्यतेलाचा अधिक वापर शरीरासाठी हानिकारक आहे. त्यातच तळीव पदार्थ तयार केल्यानंतर त्याच तेलाचा वारंवार वापर करणे अत्यंत घातक ठरू शकते. फ्री रॅडिकल्समुळे कोलेस्टेरॉलची समस्या निर्माण होत असल्याने हृदयाशी संबंधित आजार बळावू शकतात. नागरिकांनी याबाबत जागरूकता बाळगायला हवी.
- डॉ. प्रवीण ठाकरे, वाशिम
..............
किडनीवरही होऊ शकतो परिणाम
खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याने आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये यामुळे अडथळा निर्माण होऊन कालांतराने त्याचा परिणाम किडनीवरही होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तळीव पदार्थ तयार केल्यानंतर उरणारे तेल शक्यतोवर वापरात आणूच नये.
- डॉ. पंकज गोटे, वाशिम
.............
...तर होईल गुन्हा दाखल
नियमानुसार दिवसाला ५० लिटर तेलाचा वापर करणाऱ्या अन्नविक्रेत्यांना तीन वेळाच खाद्यतेलाचा वापर करता येतो. त्यानंतर तेलाची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. ५० लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर करणाऱ्यांनी तेल पुनर्वापर करूच नये; अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.
- नीलेश ताथोड, निरीक्षक, अन्न प्रशासन विभाग
.............
अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही
खाद्यतेलाचा पुनर्वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अन्न व औषध प्रशासन धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करू शकते. प्रत्यक्षात मात्र या विभागाची भूमिका यासंदर्भात पूर्वीपासूनच उदासीन राहिलेली आहे. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या एकावरही आतापर्यंत कारवाई झालेली नाही.