वाशिम : सद्याची पिढी फार गतीने विचार करणारी, विचारशिल पिढी आहे. त्यांना त्याच गतिने समजणारी शिक्षण प्रणाली असायला हवी म्हणून प्रचलित शिक्षणप्रणालीसोबत शासन आता व्यावसायिक शिक्षण प्रणालीवर भर देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ जून रोजी येथे केले. स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या राजशेखर सभागृहात माजी आमदार अँड. विजयराव जाधव यांनी वाशिम जिल्हयातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विनोद तावडे यांनी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधतांना विद्यार्थ्यांना जे शिक्षण आपण देत आहोत त्यामध्ये त्यांना रस आहे का? हे तपासणे आवश्यक आहे. शासन शिक्षकांना ४२ हजार कोटी रुपयांचे वेतन देत असून शिक्षकांच्या माध्यमाने ही विद्यार्थ्यांवर गुंतवणूक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे अन्यथा शिक्षकांवर केलेला खर्च वाया जाईल. परंतु तसे होता कामा नये याकडे प्रत्येक शिक्षकाने लक्ष देणे गरजेचे आहे. शालेय शिक्षण व उच्च शिक्षण सोबतच अनेक व्यावसायिक शिक्षण उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासाकडे वळून रोजगाराचा प्रश्न निकाली काढावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनमंत्री रामदास आंबटकर, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गोलेच्छा, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष लताताई उलेमाले, वसंतराव धाडवे, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
*संवाद साधण्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांच्या सूचना
शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद कार्यक्रमात शिक्षणमंत्री यांनी सुरुवातीलाच शिक्षकांचा पगार, वेतनवाढ, भत्त्यांबाबतचा हा कार्यक्रम नाही. त्यामुळे यावर कोणीही प्रश्न विचारु नाही, अशा सूचना दिल्यात. तरीही एका शिक्षकाने या दरम्यान थोडा फिरुन प्रश्न विचारला, यावर शिक्षणमंत्र्यांनी पहा.शिक्षक किती हुशार असतात, असे म्हटल्याबरोबर एकच हशा पिकला.