वाशिम : जिल्हय़ात अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हय़ात सर्रास जीवघेणा प्रवास सुरू असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. १ जून रोजी जिल्हय़ात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी वाहने आढळून आलीत; मात्र संबंधित विभागाला याचे काही सोयरसूतक दिसून आले नाही. जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव, मानोरा व मंगरुळपीर या सहाही तालुक्यांमध्ये होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीसह प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून बसविल्या जात असल्याचे १ मे रोजी दिसून आले. उन्हाळय़ाच्या अनेकांना सुट्टया व लग्नसराईमुळे व अपुर्या बसेसच्या संख्येमुळे नागरिक खासगी वाहतुकीकडे वळत आहे. खासगी वाहतूकदार याचा गैरफायदा घेत वाहनाच्या क्षमतेपेक्षा प्रवासी वाहनात कोंबतांना दिसून येत आहेत. प्रवासी वाहतूक करणारे वाहने कमी पैशामध्ये प्रवाशांना प्रवास करीत असल्याने प्रवाशांचा ओढा याकडे दिसून येत असला तरी, त्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. नव्यानेच रुजू झालेल्या व कर्तव्यतत्पर म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी याकडे लक्ष देणे गरजेच झाले आहे. प्रवासी प्रवास करताना वाहनाला लटकून, कोणी चालकाच्या बाजूला बसून प्रवास करताना दिसून येत आहेत. जिल्हय़ामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात सद्य:स्थितीत धडक कारवाई मोहीम सुरू आहे. या धडक मोहिमेत गोरगरीब वाहनधारकांवर कारवाई अन् प्रवाश्यांच्या जीवित्वाशी खेळणार्यांना बगल असे चित्र जिल्हय़ात आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांसमोरून सदर प्रकार सुरू असताना याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. या संदर्भात जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हा तर जीवघेणा प्रवास !
By admin | Updated: June 2, 2015 02:15 IST