शिरपूरची लोकसंख्या जवळपास २५ हजारांच्या आसपास आहे. असे असताना गावातील सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था कुचकामी असल्याने गावात जागोजागी सांडपाणी रस्त्यावर वाहून अस्वच्छता पसरत आहे. बऱ्याच ठिकाणी केरकचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परिणामी, डासांची उत्पत्ती होऊन तापेच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताप हे कोरोनाचे प्राथमिक लक्षण असून, त्याचे रूपांतर कोरोनात होत आहे. आजघडीला शिरपूर येथे ८० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी काही जणांवर वाशिम येथे खासगी व सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही रुग्ण गावातच आहेत. दरम्यान, तापेचे रुग्ण रोखण्यासाठी गावामध्ये निर्जंतुकीकरण तथा धूरफवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून १५ व्या वित्त आयोगात निधीची तरतूदसुद्धा केलेली असते. असे असताना स्थानिक प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण किंवा धूरफवारणी करण्यात आली नाही. याकडे ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष पुरवावे, अशी मागणी प्रदीप देशमुख यांनी केली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST