कोरोना विषाणू संसर्गाच्या वैश्विक महामारीचा राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मोठा फटका बसला. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधूनमधून कडक लाॅकडाऊन लावण्यासोबतच शासनाने सार्वजनिक कार्यक्रम, उत्सवांवर बंदी लादली. यासह लोककलावंतांमार्फत शासकीय योजनांच्या जनजागृतीलाही ‘ब्रेक’ लावण्यात आला. यामुळे कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनावर उदरनिर्वाह चालत असलेले लोककलावंत व त्यांच्या कुटुंबावर उपासमार ओढवली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती बहुतांशी नियंत्रणात असल्याने शासनाने पुन्हा एक वेळ नव्या दमाने लोककलावंतांमार्फत योजनांच्या जनजागृतीचे कार्यक्रम सुरू करावे, अशी मागणी कलावंतांमधून होत आहे.
..................
कोट :
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १८ महिन्यांपासून शासकीय योजनांच्या जनजागृतीचे सर्वच कार्यक्रम बंद आहेत. यामुळे लोककलावंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आता कोरोना नियंत्रणात असल्याने इतर सर्वच व्यवहार सुरू झाले, त्या धर्तीवर शासनाने जनजागृतीचे कार्यक्रम सुरू करून लोककलावंतांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.
- संतोष खडसे, लोककलावंत, वाशिम