वाशिम : ग्रामीण भागातील लोकांना स्वत:कडील वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आधार ठरलेले आठवडे बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने ग्रामीण अर्थचक्राला टाळे लागले आहे. अनेकांच्या उपजीविका सोबतच कितीतरी प्रश्न एकाच वेळी उभे ठाकले आहेत.
लहान वस्तूंपासून ते मोठ्या कुठल्याही वस्तू मिळण्याचे आठवडे बाजाराचे ठिकाण कधी बंद नसायचे. मात्र, कोरोना संसर्ग पसरण्याच्या भीतीने वर्षभरात दुसऱ्यांदा हे बाजार बंद झाले. तालुकास्तरीय बाजारातील उलाढाल लाखोंच्या घरात होती, शिवाय यावर अनेकांची उपजीविका होती. शेतातील माल विकण्याचा हा सोपा पर्याय देखील होता. भाजीपाला, अन्नधान्य विकायचे आणि याच पैशांतून दैनंदिन बाजारहाट करायची ही साखळी ग्रामीण भागासाठी पूरक होती. मात्र, आठवडे बाजार भरण्यास मनाई केल्यामुळे नेहमीच लोकांनी गजबजणारे व आपले अर्थचक्र चालवित असलेले आठवडे बाजार बंद झाल्याने या बाजार परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊननंतर आठवडे बाजार भरायला सुरुवात होत असतानाच ते पुन्हा बंद झाल्याने यावर अवलंबून असणारे अनेक जण हादरले. कारण वर्षभरापासून या संकटाने कोलमडलेले व्यवसाय आता कुठे स्थिरावला असताना, पुन्हा एकदा संकट उभे ठाकले. कठोर बंधने घातली जावी, पण काही नियम, अटी ठेवून आठवडे बाजाराला परवानगी द्यावी, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.