वाशिम : स्थानिक पुसद मार्गावरील रेल्वेगेटजवळ रेल्वे येण्याची वेळ झाल्यानंतर गेट बंद दरम्यान मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी होवून वाहतूक विस्कळीत होत असते. येथे उडडाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. या उडाण पुलासाठी सामाजिक संघटनासह बर्याच जणांनी प्रयत्न केले.मात्र अद्यापही भिजत घोंगडे कायमच असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे येत असतांना लावलेल्या गेट खालून अनेक जण जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम - पुसद रस्त्यावर रेल्वेगेट असून दिवसातून या रस्त्यावरून बर्याचशा रेल्वे गाडया धावतात. जेव्हा जेव्हा रेल्वेगाडी येईल तेव्हा तेव्हा हे गेट बंद करण्यात येते. या बंद गेटमुळे प्रत्येकवेळी मोठया प्रमाणात वाहतूक प्रभावित होऊन लांबलचक रांगासुध्दा लागतात. रेल्वेगेट उघडल्याबरोबर आपल्याला आधी जायला मिळावे असे प्रत्येकाला वाटत असल्याने संपूर्ण रस्ता जाम होऊन जातो व तासनतास वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागते. येथे उडाण पूल तयार व्हावा याकरीता शहरातील सामाजिक संघटनांसह बर्याच जणांनी प्रयत्न केले. काही नागरिकांनी तर चक्क उपमुखयमंत्री अजित पवार वाशिम येथे दौर्यावर आले होते तेव्हा त्यांना निवेदन दिले होते. अजित पवार यांनी सुध्दा आपल्या भाषणात नागरिकांनी या संदर्भात निवेदन मिळाले असून लवकरच या कामास हिरवी झेंडी देऊन नागरिकांची मागणी पूर्ण केल्या जाणार असल्याचे आपल्या जाहीर सभेत सांगितले होते. मात्र, त्यालाही बराच अवधी उलटला.मात्र, अद्याप कोणत्याच प्रकारची कार्यवाही या संदर्भात झालेली दिसून येत नसल्याने नागरिकांना, वाहनधारकांना तास न तास रांगेत उभे राहून आपला वेळ खर्च करावा लागत आहे. येथे उडडाण पूल झाल्यास येथे होणारी प्रभावित वाहतूकीचा प्रश्न मिटणार असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले अहे. तसेच जोपर्यंत येथे उडडाणपूल तयार होत नाही तोपर्यंत तरी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी शहर वाहतूक शाखेला सूचना देऊन येथे एका शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्याची नियुक्ती करून येथे होत असलेल्या विस्कळीत वाहतूकीला सुरळीत करणे गरजेचे आहे.तरी संबधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उड्डाण पुलाचे भिजत घोंगडे कायम
By admin | Updated: May 14, 2014 00:47 IST