वाशिम, दि. ५ : सोमवारी घरोघरी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे थाटात आगमन झाले असून, वाशिम जिल्ह्यात २0५ गावांमध्ये 'एक गाव,एक गणपती'चा उपक्रम प्रत्यक्षात साकारण्यात आला. सामाजिक एकोपा राखण्यासाठी आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातर्फे गावकर्यांना 'एक गाव, एक गणपती' या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले जाते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन गावकर्यांना केले होते. प्रत्येक तालुक्यात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी बैठका घेऊन एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. गावकर्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गावकर्यांनी गावात या उपक्रमाबाबत एकमेकांशी हितगूज साधले. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या एकजूटीतून जिल्ह्यातील २0५ गावांत 'एक गाव-एक गणपती' हा उपक्रम साकारण्यात आला. २0५ गावांमध्ये केवळ एका गणरायाची स्थापना झाली असून, येथे सर्व गावकरी मिळून विविध उपक्रम राबविणार आहेत. सोमवारी सकाळपासूनच ग्रामीण भागात गणरायाची स्थापना करण्याची लगबग सुरू होती. शहरी भागातून गणेशभक्तांनी गणरायाच्या आकर्षक मूर्ती घेऊन गावात मोठय़ा उत्साहात गणरायाची वाजत-गाजत मिरवणूक काढली. विसर्जनापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
२0५ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’
By admin | Updated: September 6, 2016 01:57 IST