बोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमा भागात आरटीओची पाटी लावून फिरणाऱ्या खाजगी वाहनाने दहशत निर्माण केली आहे. या प्रमुख राज्य मार्गावर अवैध तसेच अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. त्याचा लाभ उठविण्याचे सत्र हे वाहन करीत असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र गुजरात सीमा भागात डहाणू बोर्डी हा प्रमुख राज्य मार्ग आणि उंबरगाव वेवजी- तलासरी हा राज्य मार्ग आहे. या मार्गावरून लगतच्या उंबरगाव, भिलाड, वापी या ठिकाणी जीआयडीसीत आणि दमण तसेच सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशाकडे जाणारी वाहने धावत असतात. मुंबई- अहमदाबाद या राष्ट्रीय मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड मालाची वाहतूक केल्यास दंड आकारणी आणि टोल वसूल केली जाते. ती टाळण्यासाठी या राज्य मार्गांचा वापर मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. मार्गाची दुरावस्था, वाढते अपघात तसेच गैरप्रकार आदींमध्ये वाढ झाली आहे. मात्र परिवहन विभाग कारवाई करीत नाही.शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी पांढऱ्या रंगाचे खाजगी वाहन आरटीओची पाटी लावून सीमा भागातील रस्त्यांवरून फिरत होते. त्यामुळे वाहतूक नियमांचा आधार घेत दंड वसूली केली जाईल या भीतीने स्थानिक वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अवजड आणि अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नव्हता. या पद्धतीने बेकायदेशीर पाट्या लावून गैरमार्गाने माया जमविणारी टोली सक्रीय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे परिवहन विभागाने हा नेमका प्रकार काय आहे याची चौकशी करणे अत्यावश्यक आहे. ती न झाल्यास रहिवासी स्वत: या वाहनाला आडकाठी करून शहनिशा करतील असा इशारा स्थानिकांनी आरटीओ आणि पोलिसांना दिला आहे. (वार्ताहर)
आरटीओच्या पाटीचे ‘ते’ वाहन कुणाचे?
By admin | Updated: February 8, 2017 03:54 IST