पालघर - पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील शिंदेसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याला पालघरचे नवनिर्वाचित पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेने केंद्रशासित प्रदेश सिल्वासा येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपीस १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी अविनाश याला अटक केली होती, मात्र घोलवड पोलिसांच्या ताब्यातून पळून जाऊन फरार झाला होता.
अशोक धोडी यांचे १९ जानेवारी रोजी वेवजी घाटातील हिलझील डोंगराच्या वळणावर अपहरण केल्यानंतर त्यांचा मृतदेह ३१ जानेवारी रोजी गुजरात राज्यातील भिलाडजवळील सारीग्राम येथे एका बंद दगडखाणीत टाकलेल्या त्यांच्या कारमध्ये सापडला होता. पालघर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास करत आरोपी अविनाश धोडी, विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती. त्यांना त्यावेळी स्थानिक न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र अविनाश घोलवड पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.
दारू विक्रीसाठी ठरत होता अडसर अनेक महिने तपास करूनही तो सापडत नसल्याने पालघर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. दमण आणि सिल्वासा येथील दारू महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी आणण्याच्या गोरख धंद्यात अडसर ठरत असल्याच्या कारणातून अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या केल्याची माहिती पोलिसांसमोर आली होती.
तीन साथीदार अद्याप फरार पालघर पोलिसांनी अनेक पथके नेमल्यानंतरही अविनाश हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पालघरचे नवे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल सावंतदेसाई, गोरखनाथ राठोड, रोहित खोत, राजेश वाघ, सुनील नलावडे, दीपक राऊत, नरेंद्र पाटील, भगवान आव्हाड, विजय ठाकूर आदींच्या पथकाने केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासा येथील एका घरात लपून बसलेल्या अविनाशच्या मुसक्या आवळल्या. अद्याप या प्रकरणात आरोपीचे तीन साथीदार फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.