पालघर : पालघर जिल्हा निर्मितीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी होत आला असला तरी स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या पालघर शाखेतून देण्यात येणाऱ्या कागदपत्रात अजूनही पालघर ऐवजी ठाणे जिल्ह्याचा उल्लेख केला जात असल्याने ही खेद जनक घटना असल्याने त्यात तात्काळ बदल करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर विविध बँका, अनेक विभागानी आपल्या पत्त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा उल्लेख वर्षभराच्या कालावधीत संपवून पालघर जिल्ह्याचा उल्लेख केला. भारताच्या नकाशात ही स्वतंत्र पालघर जिल्ह्याचे अस्तित्व दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत राष्ट्रीयकृत अग्रणी बँक असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पालघर शाखेच्या कागदपत्रात मात्र अजूनही पालघर जिल्ह्या ऐवजी ठाणे जिल्हा असाच उल्लेख केला जात आहे.ह्या बँकेत जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षिका कार्यालय,जिल्हा परिषद पालघर या तीन महत्वपूर्ण विभागातील अनेक कार्यालयाची बँक खाती आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजनांचे पैसे, अनुदानेही नानाविध विभागाकडून स्टेट बँकेमार्फत देण्यात येतात.तसेच अनेक नागरिकांसह व्यापारी, कारखानदार, बिल्डरही आपला व्यवहार ह्याच बँकेतून करीत असल्याने आधार कार्डच्या वेळी बँकेचे पासबुक ग्राह्य असल्याने अनेकांच्या आधारकार्डवर आजही ठाणे जिल्हा म्हणून नमूद असल्याने ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे. (वार्ताहर)
स्टेट बँकेत पालघर जिल्हाच नाही?
By admin | Updated: February 1, 2017 02:53 IST