नालासोपारा (मंगेश कराळे) : मिसिंग असलेल्या ७५ वर्षीय वयोवृद्धाची एक महिन्यांपूर्वीच हत्या झाल्याचा प्रकार नायगाव पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी एक मुलगी व एक मुलगा असे दोन अल्पवयीन आरोपींना अटक करून चौकशी व तपासासाठी उत्तन पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली.
बोरिवलीत राहणारे व फेरीचा व्यवसाय करणारे किशोर मिश्रा (७५) हे घटनेच्या दिवशी नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीवरी रोडवरील सनटेक बिल्डिंगच्या परिसरात आले होते. पण ते त्यानंतर बोरिवली येथील घरी पोहचले नाही. घरच्यांनी नातेवाईक यांच्याकडे त्याचा शोध घेतला पण ते मिळून आला नाही. म्हणून त्यांच्या मुलाने १५ फेब्रुवारीला किशोर मिश्रा हे मिसिंग असल्याची तक्रार दिली. त्याचा तपास पोलीस हवालदार देविदास पाटील यांच्याकडे देण्यात आला.
सदर मिसींग मिश्रा यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्याने काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून नायगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन वेगवेगळे पथके बनवून शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तपासा दरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आधारे मिश्रा हे एक मुलीसोबत भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात उतरुन बाहेर पडताना दिसले. त्यानंतर मिश्रा व संशयीत मुलगी दिसून न आल्याने तांत्रिक विश्लेषन व माहितीच्या आधारे एक अल्पवयीन मूलगी व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली. किशोर मिश्रा हे अल्पवयीन मूलीला कामाचे ठिकाणी कायम शिवीगाळी करायचे. त्याच गोष्टीचा राग मनात धरुन उत्तन येथील बालेशाह पीर दर्गाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्याजवळ दोन्ही अल्पवयीन आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड व परशीची लादी टाकुन हत्या करुन त्यांचा मृतदेह बाजूला असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये फेकून दिला. उत्तन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगीरी पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, नायगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद पवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रोशन देवरे व गणेश केकान, पोहवा देविदास पाटील, शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पाडुरंग महाले, अमोल बरडे यांनी केली आहे.