मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, रॅलींचे येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. रॅलींद्वारे तर राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात गुंतले आहेत. यंदा मुंबईतील वाहतूक पोलिसांकडे रॅलींसाठी तब्बल ३,५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. आघाडी आणि महायुती तुटल्याने रॅलींची संख्या यंदा वाढल्याचे सांगितले जात आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर होती, तर १ आॅक्टोबर ही उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्यास बराच वेळ लागल्याने आणि त्यावर लक्ष ठेवून असलेल्या अन्य पक्षांकडूनही उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर लागल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास बराच कमी कालावधी मिळाला. त्यामुळे जास्तीत जास्त प्रचारासाठी उमेदवारांनी रॅली काढण्यावरच भर दिल्याचे दिसून आले आहे. राजकीय पक्षांना रॅली काढायची असल्यास त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणेही आवश्यक असते. त्यानुसार मुंबई वाहतूक पोलिसांच्या २५ चौक्यांमध्ये ३६ मतदारसंघांतून तब्बल ३ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात घाटकोपर, विक्रोळी, ट्रॉम्बे, मुलुंड, विमानतळ, वाकोला, डी. एन. नगर, पायधुनी चौक्यांमध्ये सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. घाटकोपरमधून ३८२, विक्रोळीतून ३५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि शिवसेना-भाजपा याची महायुती तुटल्याने या रॅलींची संख्या वाढली आहे. (प्रतिनिधी)
साडेतीन हजार रॅलींचा धुरळा
By admin | Updated: October 6, 2014 03:58 IST