विक्रमगड : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कासा बुद्रुकमधील २५४ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून गुरुवारी झालेल्या विषबाधा प्रकरणी अन्नाच्या तपासणीचे नमूने आल्यानंतरच संबंधीतांवर कारवाई केली जाईल अशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी येथे केली. यावेळी त्यांच्या समवेत आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार अमित घोडा, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.२५४ विद्यार्थ्यांपैकी एकूण १५२ विद्यार्थ्यांना अन्न विषबाधेची लक्षणे दिसून न आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तसेच १०९ विद्यार्थ्यांना निरिक्षणार्थ उपजिल्हा रुग्णालय, कासा येथे दाखल करून घेण्यात आले असून त्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कासा यांनी सांगितले.ही विषबाधा इस्कॉनने पुरविलेल्या आहारातून झाल्यामुळे इस्काँन फुड रिलीफ फाउंडेशन वाडा विरुद्ध मुख्याध्यापक भोये यांनी निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली. ती वरून कलम २५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
अहवाल आल्यानंतरच दोषींवर कारवाई - सावंत
By admin | Updated: February 28, 2016 04:05 IST