पालघर : आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण महाविद्यालयात बुधवारी १० वीच्या विज्ञान विषयाच्या पेपरला कॉपी करणाऱ्या ९ विद्यार्थ्यांना भरारी पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात एसएससी बोर्डाकडे अहवाल पाठविण्यात आला असून चौकशीअंती त्यांच्यावर कारवाई होणार आहे.पालघर जिल्ह्या १० वीच्या परिक्षेसाठी ८२ केंद्राअंतर्गत ५० हजार १२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कॉपीला आळा बसावा म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अखत्यारीत दोन भरारी पथके नेमण्यात आली होती. सफाळे जवळील लोकनायक जयप्रकाश नारायण या शाळेमधील केंद्रात सर्रास कॉपीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाअधिकारी राजेश कंकाळ यांच्या भरारी पथकाने या शाळेवर धाड टाकून विद्यार्थ्यांची झडती घेतली असता ९ विद्यार्थ्यांच्या जवळ कॉपी सापडल्या. कंकाळ यांनी सर्व ९ विद्यार्थ्यांचे पेपर जप्त करून उरलेल्या वेळेसाठी त्यांना नवीन पेपर लिहीण्यास दिला. यावेळी या ९ विद्यार्थ्यांचा अहवाल एसएससी बोर्डाकडे पाठविण्यात आला असून या विद्यार्थ्यांच्या एका पेपरचा निकाल रोखून धरणे, सर्व पेपरच्या निकाल रोखून धरणे किंवा वरील ९ विद्यार्थ्यांना तीन वर्षापर्यंत परिक्षा देण्यापासून रोखने या पैकी एक शिक्षा सुनावणी अंती सुनाविण्यात येईल अशी माहिती शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी दिली. (प्रतिनिधी)
आगरवाडी केंद्रात ९ कॉपीबहाद्दर पकडले
By admin | Updated: March 17, 2016 02:39 IST