वर्धा : मूळची वर्धेकर असलेली डॉ. वसुप्रिया कुऱ्हेकर हिने मिसेस इंडिया या स्पर्धेत ‘मिसेस इंडिया कॉन्फीडेन्स २०१६’ हा पुरस्कार पटकाविला आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हा पुरस्कार पटकाविणारी ती पहिली वर्धेकर ठरली आहे. वसुप्रियाच्या या यशाने ग्लॅमर जगतात वर्धेला लौकीक प्राप्त झाला आहे. व्यवसायाने न्यूरो फिजिओथेरपिस्ट असलेल्या वसुप्रियाचे माध्यमिक शिक्षण वर्धेतच झाले. अग्रगामी व लॉयड्स विद्या निकेतन येथून तिने शिक्षण घेतले. वसूप्रियाचे वडील रामानुजन चारी हे भूगाव येथील लॉयड्स स्टील प्लान्ट येथे कार्यरत होते. २०१२ मध्ये वसूप्रियाचा आदित्य कुऱ्हेकर यांच्यासोबत विवाह झाला. पूर्वीपासूनच योगा आणि अॅरोबिक्स या व्यायाम प्रकारात तिला रूची असल्याने यात सातत्य राखण्याचा तिने सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळेच आज ती ‘फिट’ आहे. वसुप्रियाला दोन वर्षांचा मुलगा असून प्रथमदर्शनी तिच्याकडे पाहिल्यास तसे जाणवत नाही. या प्रवासाची सुरुवात कशी झाली याची माहिती देताना ती म्हणाली की, टी.व्ही. पाहताना मिसेस इंडिया स्पर्धेकरिता प्रवेश मागविल्याची जाहिरात पाहिली. या स्पर्धेकरिता आपणही अर्ज करावा, अशी इच्छा मनात तरळली. ही बाब पतीला बोलून दाखविली असता त्याने लगेच संमती दिली. देशभरातून ४२ स्पर्धकांची निवड झाली. सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकष पूर्ण केल्यावर वसुप्रियाची पुढील फेरीकरिता निवड करण्यात आली. यात मुलाखत, टॅलेन्ट तसेच नववधू, पारंपरिक पोषाख असे निकष पूर्ण करीत मिस कॉन्फीडेन्ट हा पुरस्कार पटकाविला. या प्रवासात तिला सासू, सासरे व पतीचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्याने अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत यश मिळविता आल्याचे ती सांगते. अंतिम १८ स्पर्धकांमध्ये वसूप्रियाने स्थान मिळविले होते. या स्पर्धेत एनआरआय स्पर्धकही सहभागी असताना तिने अंतिम फेरी गाठली, हे विशेष!(स्थानिक प्रतिनिधी)
वर्धेच्या वसुप्रियाचा मिसेस इंडिया स्पर्धेत ठसा
By admin | Updated: March 3, 2016 02:05 IST