आष्टी : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना शासनाने १५ रुपयांत वीज जोडणी देण्याचे धोरण अंमलात आणले होते; पण योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा दुर्लक्षित असल्याने चांगल्या योजनेची वाट लागली़ याचा प्रत्यय येथील रेखा शंकर मोहोड यांना आला़ गत पाच वर्षांपासून त्यांनी वीज जोडणीसाठी फरफट होत आहे़ रेखा यांनी महावितरणच्या सहायक अभियंता कार्यालयात ६ एप्रिल २०१० रोजी बीपीएल अंतर्गत वीज जोडणीसाठी अर्ज केला होता़ त्यांना १५ रुपये भरावे लागले होते़ त्यांना ८५०६९२४ या क्रमांकाची पावती देण्यात आली़ यानंतर अवघ्या महिनाभरात वीज जोडणी देऊ, असे सांगण्यात आले; पण निर्धारित कालावधीत मीटर मिळाले नाही़ यामुळे त्यांनी कार्यालयात चौकशी केली; पण संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शासनाने दारिद्र्यरेषेखाली असल्याने इंदिरा आवास योजनेचा लाभ देऊन हक्काचे घरकूल दिले़ घराचे काम झाल्यावर वीज मिटर मिळणे क्रमप्राप्त होते; पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अरेरावी धोरणाचा फटका त्यांना बसत आहे़परिस्थिती जेमतेम असून त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ पाच वर्षांपासून महावितरणकडे मिटर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ अनेक कुटुंबे आजही वीज पुरवठ्यापासून वंचित आहे़ शासनाने आतातरी वीज जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़(प्रतिनिधी)
पाच वर्षांपासून वीज जोडणीसाठी महिलेची फरफट
By admin | Updated: February 15, 2015 01:51 IST