वर्धा : राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण मोहीम राबविण्यात येत असून मतदारांनी आपल्या आधार कार्डाच्या तपशीलाची माहिती प्रपत्र. अ मध्ये भरून संबंधित नोंदणी अधिकारी (बीएलओ) यांच्या मार्फत कार्यालयास सादर करावी. यातून मतदारांना मतदार यादीतील नावांचा तपशील व आधार क्रमांक याची सांगड घालता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. या अनुषंगाने १ जानेवारी २०१५ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीमध्ये आपले नाव ३१ मे २०१५ पर्यंत संबंधित मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात किंवा संबंधित यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याकडे नमुना क्रं. ६ भरून नाव नोंदवावयाचे आहे. प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी याबाबत विशेष मोहीम आयोजित करण्यात येत असून त्या अनुषंगाने मे महिन्यात १७ मे २०१५, जून महिन्यात २१ जून २०१५ व जुलै महिन्यात १२ जुलै २०१५ या दिवशी प्रत्येक जिल्ह्यात मतदार संघातील प्रत्येक मतदार केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, कार्यालय प्रमुख, मुख्याध्यापक व संबंधित कार्यालय, शाळा, महाविद्यालयाचे संगणक आॅपरेटर यांचे विकास भवन वर्धा येथे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. संबंधितांनी त्यांचे नातेवाईक व मतदारांना या मोहिमेस मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले आहे. मतदार याद्या प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत इपीक नंबर, आधार नंबर, ई-मेल इत्यादी माहिती एकत्रित करण्याचे मुख्य उद्देश आहे.(प्रतिनिधी)मतदारांनी त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत असलेले नाव सोडून इतर ठिकाणी असलेले मतदार यादीतील नाव स्वत:हून वगळण्यासाठी नमुना क्रं-७ भरावा. ज्या मतदारांचे दोन किंवा जास्त ठिकाणी दुबार नाव असल्यास त्यांनी दुबार नावे वगळण्यासाठी स्वत:हून कार्यवाही करणाऱ्यांना शासनाकडून प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे. ज्या मतदारांना त्यांच्या छायाचित्र मतदार ओळखपत्रातील (ईपीआयसी) व मतदार यादीतील चुका दुरूस्त करावयाच्या आहेत, अशा मतदारांनी नमुना क्रं-८-अ भरून देणे अनिवार्य आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल (एनव्हीएसपी) तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या सकेतस्थळर माहिती उपलब्ध आहे. सोबतच एस.एम.एस. सुविधा, ई-मेल द्वारा, मोबाईल अॅपची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. टोल फ्री क्रमांक १९५०, विहीत नमुन्यातील अर्जासोबत ईपीक व आधार कार्ड यांची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
मतदार यादी शुद्धीकरण मोहीम
By admin | Updated: May 15, 2015 01:53 IST