वर्धा : जिल्हा परिषदेच्या वतीने मित्र उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत विपश्यना साधना प्रशिक्षण घेण्यासदर्भात शासनास एक परिपत्रक सादर करण्यात आले होते. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतून आनापान साधना वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (ंप्राथमिक) रवींद्र काटोलकर यांनी दिली. ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता सदर प्रशिक्षण राबविले जाणार आहे. तीन टप्प्यात सदर प्रशिक्षण राबविले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थी, हिंसा, चोरी, खोटे बोलणे, लैंगिक दुर्व्यवहार व मादक पदार्थ्यांचे सेवन आदीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये आनापान क्रियेद्वारे श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रीय करणे यावर मार्गदर्शन तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आनापान क्रीयेद्वारे अनुभवलेली मन:शांती इतरांमध्ये प्रसारित करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. आनापान साधनेच्या दैनंदिन सरावामुळे मुलांमध्ये एकाग्रता मनाची जागृतता व सतर्कता काढण्यास मदत मिळणार आहे. तसेच स्वयंशासन वृद्धीगत होणे, स्मरणशक्ती व निर्णय क्षमता तसेच आत्मविश्वास वाढणे, भीती, राग, चिड, उदासिनता कमी होण्यास मदत मिळणार आहे. या साधना पद्धतीमध्ये कोणतेही धार्मिक कार्य वा कर्मकांड अंतर्भूत नसल्याने तिचे आचरण एका सदृढ मानसिकतेच्या पिढीच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी व संबधितांमार्फत सांगण्यात आले आहे.सदर आनापान साधना वर्ग शाळांमध्ये प्रशिक्षित मित्र शिक्षकांमार्फत १२ दिवस देण्यात येणार आहे.(शहर प्रतिनिधी)
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विपश्यना साधना प्रशिक्षण
By admin | Updated: February 16, 2015 01:33 IST