वर्धा : विधानसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदार संघात भाजपाचे उमेदवार समीर कुणावार यांनी प्रतिस्पर्धांच्या जमानती जप्त करून अभूतपूर्व विजय मिळविला. त्यांना ९० हजार २७५ मते मिळाली असून बसपाच्या प्रलय तेलंग यांचा त्यांनी ६५ हजार २३२ मतांनी पराभव केला. त्यांचे मताधिक्य राज्यात सर्वाधिक असावे.या निवडणुकीत एकूण १ लाख ८७ हजार ८६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पोस्टल मतदान ९८९ असून ९५१ मतदारांनी नोटाचा वापर केला़ सकाळी ८ वाजता मतमोजणीस सिंदी रेल्वेपासून प्रारंभ होऊन पहिल्या फेरीतच कुणावार यांनी राकाँचे राजू तिमांडे यांच्यावर ३ हजार ८८४ मतांची आघाडी घेतली़ २४ व्या फेरीत ही आघाडी ६५ हजार २३२ मतांवर पोहोचली़ मनसे उमेदवार अतुल वांदीले यांना ७ हजार ३१०, शिवसेनेचे अशोक शिंदे २१ हजार ५२३, काँग्रेसच्या उषाकिरण थुटे १२ हजार ५५०, बसपाचे प्रलय तेलंग २५ हजार १००, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे २३ हजार ८३, रिपाइंचे डॉ. मोरेश्वर नगराळे ३६५, बमुपाच्या लता थूल ३६८, गोंगपाचे विनोद उईके ६५६, अपक्ष किसना व्यापारी १ हजार ११२, गजानन सोनवणे ९०४, गजू कुबडे १ हजार ५९८, जगन्नाथ राऊत ५१५ व प्रवीण उपासे यांना १ हजार ४५६ मते मिळाली.एकूण १ लाख ८७ हजार ८६१ मतदानाच्या सहाव्या भागाची म्हणजे ३१ हजार ३१० मते १३ ही उमेदवारांना घेता आली नाही. शिवसेनेचे शिंदे यांची ही सहावी निवडणूक असून १९८९ मध्ये त्यांनी २३ हजार ८३० मते घेतली होती़ राकाँचे माजी आ़ राजू तिमांडे यांची चौथी निवडणूक होती. यंदा दोघांना मिळालेली मते आतापर्यंतची त्यांची सर्वात कमी मते आहेत.पहिल्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. दुपारी ४ वाजता बीसीसी ग्राऊंडवरून कुणावार यांची विजयी मिरवणूक निघून त्यांच्या घरी पोहोचली़ यंदा पहिल्यांदाच येथे भाजपचे कमळ फुलले़ मिरवणुकीत नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, वसंत आंबटकर, रमेश धारकर, प्रेम बसंतानी, किशोर दिघे, श्याम भिमनवार, शंकर यंकेश्वर, राजेश शेंडे आदींसह मतदार कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भूगांवकर तर तहसीलदार दीपक करंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.(तालुका प्रतिनिधी)
राज्यात सर्वाधिक मताधिक्याचा हिंगणघाट मतदार संघात विक्रम
By admin | Updated: October 19, 2014 23:59 IST