सेलू : तालुक्यात निर्मलग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहितपूर ग्रामपंचायत विविध कारणांनी गाजत आहे़ या ग्रा़पं़ च्या कर्मचाऱ्याला एक वर्षापासून वेतनच देण्यात आले नाही़ यामुळे सदर कर्मचारी न्यायाकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कर्मचाऱ्याला वेतन देणे गरजेचे झाले आहे़सहा वर्षांपासून गणेश पांडुरंग डायगव्हाणे हा युवक ग्रा़पं़ मध्ये स्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. २३ मे २०१४ रोजी ग्रामपंचायतमध्ये नवीन सरपंच व समिती कार्यरत झाली़ तेव्हापासून सरपंच सुड भावनेतून वेतन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे़ प्रत्येक महिन्याला वेतन मागितले असता सरपंच नकार घंटा वाजवित असल्याने कर्मचाऱ्याच्या घरची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. नव्याने रूजू झालेल्या ग्रामसेविका शुभांगी कांबळे यांनी सदर कर्मचाऱ्याचे वेतन अदा करण्याकरिता बँकेचा धनादेश तयार केला. २३ एप्रिल २०१५ रोजी ४४२०१६५०४ क्रमांकाचा ५६ हजार १०० रुपयांचा धनादेश तयार करून त्यावर सचिवांनी शिक्का व सही केली; पण सरपंचाने त्यावर सही करण्यास नकार दिला़ यामुळे कर्मचाऱ्याला पुन्हा वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबत ग्रा़पं़ कर्मचाऱ्याने १७ जानेवारी, २ मे आणि ७ मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले; पण या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली़ यामुळे गणेश डायगव्हाणे यांनी जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आहे. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंतचे वेतन देण्यास सरपंच टाळाटाळ करीत असून ‘मी तुझ्या चेकवर सही करीत नाही’, असे सांगितल्याने वेतन कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.यामुळे शासनाच्या निर्णयानुसार सरपंचावर कारवाई करावी, अशी मागणीही कर्मचाऱ्याने केली आहे. नव्याने पदभार सांभाळलेल्या गटविकास अधिकारी या कर्मचाऱ्याला न्याय देतील काय, याकडे वाहितपूर येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे़ वेतन नसल्याने सदर कर्मचाऱ्याच्या कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे़ सौर ऊर्जा दिवे व कचराकुंड्याची तक्रार सदस्याने केल्यानंतरही याचे बिल देण्यासाठी पुढाकार घेणारे अधिकारी कर्मचाऱ्याच्या वेतनाबाबत उदासिन का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़(शहर प्रतिनिधी)
वाहितपूर ग्रा़पं़च्या कर्मचाऱ्याचे वेतन रखडले
By admin | Updated: May 14, 2015 02:00 IST