आकोली : गैरकायदेशीर मंडळी जमवून शासकीय जागेवर पुतळा बसविल्याप्रकरणी सेलू पोलिसांनी शुक्रवारी १७ जणांवर गुन्हे दाखल केले होते. या १७ जणांना सेलू पोलिसांनी रविवारी अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत वादग्रस्त जागेवर कोणतेही बांधकाम करू नये असे सांगितले होते. पण शुक्रवारी रात्री तामसवाडा गावात रात्रीच्या सुमारास सदर पुतळा बसविला होता. सरपंच छाया कोहळे यांनी रात्री दिलेल्या माहितीवरून कारवाई करून पुतळा ताब्यात घेतला. तसेच याप्रकरणी सेलू पोलिसांनी १७ जणांवर कलम १४३ व ४४७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये गौतम राऊत, छत्रपती पाटील, रघुनाथ गोडघाटे, विष्णु म्हैसकर, अमीत म्हैसकर, संदीप पाटील, छाया पाटील, लता राऊत, शांता मुन, दादाराव राऊत, गजानन जिंदे, राहुल गौरखेडे, प्रतिभा गौरखेडे, वसंता राऊत, शशीकला राऊत, प्रमीला म्हैसकर यांचा समावेश होता. या १७ जणांना रविवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्वांना जामीन मिळाला आहे. तसेच या प्रकरणी तामसवाडा येथे उपोषणही सुरू होते. ते देखील आज मागे घेण्यात आले आहे. शनिवारी वर्धेत झालेल्या आंदोलनात बसपाचे जिल्हाध्यक्ष उमेश म्हैसकर व इतर पाच जणांना ११ वाजता शहर ठाण्यातून जामिनावर सोडण्यात आले.(वार्ताहर)
‘त्या’ १७ जणांना अटक व सुटका
By admin | Updated: April 27, 2015 01:34 IST