पुलगाव : शिक्षणसंस्था म्हणजे विद्येचे मंदिर व त्यात विद्यादान करणारे गुरुजन म्हणजे देव, अशी प्राचीन विचारधारा होती़ गुरूकूल म्हणजे विद्यालय व दूरदूर विद्यार्थी गुरूकुलात शिक्षणासाठी यायचे, आजही जातात; पण आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक संस्थांचा वाढता व्याप पाहता विद्यार्थी संख्या कमी पडू लागली आहे़ यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था प्रकाशझोतात राहून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते़ आई-वडील वा आदरनीय व्यक्तींनी केलेल्या सामाजिक कार्याचा उमटलेला ठसा कायम राहावा, त्यांच्या स्मृती व त्यांचे कार्य सामान्य माणसाला सतत प्रेरणादायी ठरावे या भावनेतून शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या़ यातून समाजप्रेम असणार्यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली होती़ यामुळे कर्तबगार, कुशल कार्यक्षम शिक्षक, कर्मचारीदेखील आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत होते़ त्यांना प्रसिद्धीझोतात राहण्याची गरज भासत नव्हती; पण बदलत्या परिस्थितीत हळूहळू विद्यामंदिरात ज्ञानदीप चेतविणार्यांचे हात दीप प्रज्वलीत करताना थरथरू लागले़ परिणामी, शिक्षण संस्थांतील वातावरण दूषित होऊन विद्यामंदिराचे रुपांतर संस्थांमध्ये झाले व संस्थांचे पेव फुटले़ प्राथमिक शाळेपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्वच संस्था आपल्या मूळ उद्देशापासून दूर गेल्या असून बाजारीकरण होत आहे़ शैक्षणिक संस्थेत पोषक वातावरण, क्रीडांगण, इमारत वा आवश्यक सोयी असो वा नसो, संस्था सुरू करायची, असा प्रकार सुरू आहे़ सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षण संस्था अधिक झाल्यात़ यामुळे जवळपास सर्वच शाळांना विद्यार्थी संख्या पूरेशी मिळत नसल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी या संस्थांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे़ या स्पर्धेच्या युगात प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला जात आहे़ चित्रवाहिन्यांसह केबल, आॅटारिक्षावर प्रवेशाचे बॅनर्स, पत्रके आदींच्या माध्यमातून संस्था प्रकाशझोतात येऊ लागल्यात़ इतकेच नव्हे तर संस्थेची इमारत, अद्यावत व्यवस्था विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, क्रीडांगण, प्रयोगशाळा, परिसर, शाळेत चालणारे विविध उपक्रम आदींचे चित्रीकरण करून आपली संस्था कशी दर्जेदार आहे, हे विद्यार्थी व पालकांना दाखविले जात आहे़ याच शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्याच्या सूचनाही दिल्या जात असल्याचे दिसते़ शिक्षकांना खेडोपाडी पाठवून विद्यार्थी शोधमोहिमही राबविली जात आहे़ या प्रकारामुळे शैक्षणिक संस्थांवर अशी वेळ का यावी, याचा विचार शिक्षण संस्था व शिक्षण विभागाने करणे गरजेचे झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक खेडोपाडी; संस्थांची स्पर्धाही सुरू
By admin | Updated: May 27, 2014 01:05 IST