निलंबन घेतले मागे : बापूराव देशमुख सहकारी सूत गिरणीतील संप समाप्तवर्धा : नागरिका एक्सपोर्ट प्रा.लि. मुंबईद्वारे चालविल्या जात असलेल्या स्व. बापूराव देशमुख सूत गिरणीच्या पाच कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. या विरूद्ध तसेच अन्य मागण्यांकरिता कामगारांनी सोमवारी टाकीवर चढत विरूगिरी केली. शिवाय केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना निवेदनही दिले. या आंदोलनाची दखल घेत सोमवारी सायंकाळीच निलंबित केलेल्या पाचही कामगारांना रूजू करून घेत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या. एमआयडीसी परिसरातील बा.दे. सूत गिरणीमध्ये कार्यरत कामगार २७ ते २८ वर्षांपासून कार्यरत होते. सूतगिरणी डबघाईस आली असतानाही कामगार कार्यरत होते; पण गतवर्षीपासून नागरिका एक्सपोर्ट प्रा.लि. मुंबई यांना सदर सूत गिरणी लिजवर चालवायला दिली. तेव्हापासून कामगारांना शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला. नागरिका एक्सपोर्टचे व्हाईस प्रेसीडेंट दास चौधरी यांनी कामगार व प्रतिनिधींना १६ जानेवारीपासून निलंबित केले. कामगारांनी सहकारी कामगार अधिकारी, उपजिल्हाधिकारी व सूत गिरणीचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांना निवेदन देत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही याची दखल घेतली नाही. सर्व कामगारांना न्याय मिळावा व हाताला काम मिळावे तसेच सूतगिरणी सुरळीत चालावी म्हणून कामगार प्रयत्नात असताना कुणी याबाबत चर्चा वा समेट घडवून न आणल्याने शिवसेना कामगार सेनाप्रणित युनियनचे प्रतिनिधी नाना चावरे, शिवसेना उपतालुका प्रमुख कामगार विकास खडसे, विनोद पेरकुंडे, संजय बाभुळकर या कामगारांनी सूत गिरणी परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. याबाबत केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनाही सोमवारी सेवाग्राम येथे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी लोकार्पण सेवा समितीचे अध्यक्ष नाना अनकर, शरद शिंदे, रत्नाकर शेळके, शैलेश अंबुलकर, प्रभाकर गोहणे, अजय धामणकर, रमेश ताजणे, अनिल राऊत, सतीश आगे, अमोल हिवरे, मारोती तांदुळकर, श्याम जगताप, डोर्लीकर, सुनील पानतावणे उपस्थित होते. या प्रकरणात अखेर अध्यक्ष व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख व युनियन प्रमुख रविकांत बालपांडे यांनी मध्यस्थी केले. व्यवस्थापनाने पाचही कामगारांचे निलंबन मागे घेत संप मिटविला.(कार्यालय प्रतिनिधी)
कामगारांच्या ‘वीरूगिरी’मुळे व्यवस्थापन झुकले
By admin | Updated: February 3, 2016 02:21 IST