पिके आॅक्सिजनवर : जमिनी पडल्या कोरड्यावर्धा : दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती. यंदा मात्र मृगातच पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरी पेरता झाला. रोप अंकुरली. पण ती बहरण्यासाठी पाऊस परतलाच नाही. दरवर्षी साथ देणारे आर्द्रा नक्षत्र यंदा पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे आकाशाकडे पावसाची वाट पाहात असलेल्या बळीराजाच्या डोळ्यातच आता पाऊस दाटला आहे. रोज दुपारी ढग दाटून येतात. गार हवेची झुळकही पसरते. पण आलेले ढग पुन्हा काही वेळातच विरून जातात. महिनाभरापासून हीच स्थिती असल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट घोंगावत आहे. यंदाच्या खरीपातील पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख २० हजार हेक्टर जमिनीवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ३७ हजार हेक्टर जमिनीवर कापसाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. १ लाख ८१ हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कापसाची ७६.२० टक्के पेरणी झाली. यात हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ४२ हजार १५८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. त्याचप्रमाणे १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ७५ हजार ५२७ हेक्टरवर म्हणजेच ७७.७५ टक्के पेरणी आतापर्यंत झालेली आहे. या दोंंन्ही पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ६०० हेक्टरवर तूरपिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३९ हजार ६५० हेक्टरवर म्हणजेच ६० टक्के पेरणी आटोपली आहे. चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला जिल्हा कृषी विभागाने दिला होता. त्यानुसार सतत चार दिवस मृगाचा पाऊस बरसल्यावरच शेतकरी पेरता झाला. परंतु त्यानंतर पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीचे सावट गडद करीत आहे. जिल्ह्यात केवळ १० टक्केच क्षेत्र हे पूर्ण ओलिताखाली असून ९० टक्के जमीन ही कोरडवाहू क्षेत्रातील आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पिके कशी जगवावी, हा प्रश्न पडला आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही भारनियमनाने ग्रासले आहे. दिवसभर वीज राहात नसल्याने पिकांना रात्र जागून ओलित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच पाणीही पुरत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. आता पाऊसच या संकटातून वाचवू शकत असल्याची भावना बळीराजा व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)कुठल्याही स्थितीत पीक जगणे महत्त्वाचेओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांना तितकीशी चिंता नसली तरी कोरडवाहू शेतकरी मात्र संकटात सापडले आहे. त्यातही विहिरीद्वारे ओलित असलेल्या शेतकरी वर्गालाच सिंचन करता येत आहे. त्यामुळे कालव्यांद्वारे जेथे सिंचनाची सोय करता येत असेल तेथे पाठबंधारे विभागाने किमान एक पाणी देता येईल एवढी सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस नाहीच आला तरी देखील पिके जगू शकतील. कालव्यांतून जेवढे पाणी सोडता येईल तेवढे पाणी सोडण्याची गरज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्यक्त केली. शेवटी जमेल तेवढी पीक जगणे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.
दुबार पेरणीचे सावट गडद
By admin | Updated: July 9, 2015 02:05 IST