हिंगणघाट : सेवाग्राम ते चंद्रपूर दरम्यान असलेल्या येथील रेल्वे स्थानकावर अनेक सुपरफास्ट प्रवासी रेल्वेगाड्या थांबत नाहीत. यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. येथील रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल यात्री संघाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत खासदार रामदास तडस यांना निवेदनही सादर करण्यात आले.भाजपा शाखेच्यावतीने नवनिनर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यानिमित्त शहरात दाखल झालेल्या खासदारांना हिंगणघाट रेल्वे यात्री संघाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. यात काही सुपरफास्ट रेल्वे गाड्या येथील रेल्वेस्थानकावर थांबत नसल्याचे सांगण्यात आले. यात सिकंदराबाद-बिकानेर, चेन्नई-जोधपूर, धनबाद-कोल्हापूर, नागपूर-सिंकदराबाद, पुणे-पटना, रामेश्वर-वाराणसी, कोल्हापूर-धनबाद, येर्णाकुलम-पटना, सिंकदराबाद-पटना आदी प्रवासी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. हिंगणघाट येथील बाजारपेठ विदर्भात मोठी म्हणून ओळखली जाते. दूरवरचे व्यापारी येथे खरेदीसाठी येतात; पण हे शहर रेल्वेच्या सुपर गाड्यांच्या थांब्यापासून उपेक्षित आहे. यामुळे दूरचे व्यापारी येथे येण्याचे टाळतात. यामुळे स्पर्धा तोकडी पडत असल्याने शेतकरीही योग्य भावापासून वंचित राहतात. शिवाय येथील कर्मचारी व विद्यार्थी दररोज अपडाऊन करतात. ठराविकच गाड्यांचा थांबा असल्याने कर्मचारी, विद्यार्थ्यांना मर्यादित वेळच आपल्या कार्याला देता येतो. केंद्रात सत्ता असल्याने शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व विद्यार्थी वर्गाची व्यथा जातीने रेल्वेमंत्र्यांना साकडे घालून दूर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी खासदार तडस यांनी आपला प्रश्न निश्चित मार्गी लागेल, असे आश्वासन यात्री संघास दिले. निवेदन सादर करताना जयंत मानकर, संजय ढगे, प्रदीप नागपूरकर, विवेक लोढा, शंतनू दवंडे, दिलीप राठी, आंनद ठमके, बोंडे, रूपेश कापकर, नरेश जोशी, चंद्रशेखर खापरे, राजू पिसे, महेश बोमीडवार, केशव तितरे यांच्यासह यात्री संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
रेल्वेच्या सुपरफास्ट प्रवासी गाड्यांचा थांबा द्या
By admin | Updated: July 22, 2014 00:00 IST