पाणी प्रश्न संघर्षाकडे : राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा हिंगणघाट: येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर नांदगाव चौकात वणा नदी पाणी बचाव संघर्ष समितीद्वारे शुक्रवारी सकाळी ११ वाजता ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यामुळे नागपूरहून हैदराबादकडे जाणारी वाहने सुमारे अर्धा तास खोळंबली. आंदोलन कर्त्यांनी नारेबाजी करून रस्ता अडवून धरला. तसेच रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडला. सुमारे १००-१५० कार्यकर्ते आणि नागरिकांनी यात भाग घेतला. नागरिक आणि समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन भूगावच्या उत्तम गाल्वा कंपनीला पाणी येथून नेवू देणार नाही, अश्या घोषणा देऊन पाण्याची पाईप लाईन टाकायला या आंदोलनाद्वारे पुन्हा एकदा विरोध दर्शविला. यापूर्वीही येथील नागरिकांच्या समितीसह न.प.सदस्य, माजी नगराध्यक्षांनी, विविध संघटनांनी, माजी आमदार राजू तिमांडे यांच्याद्वारे उत्तम गाल्वाला पाणी देण्यास विरोध दर्शविला होता. ३ फुटाच्या पाईपमधून हिंगणघाटच्या वणा नदीतून वाहते पाणी वर्धेच्या उत्तम गाल्वा मेटॅलिक कंपनीला नेण्यासाठी २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाने ८.७६ द.ल.घ.मी. पाणी उचलण्याची परवानगी दिल्या गेली. परंतु निर्धारित अवधित वणा नदीचे नियंत्रण असणाऱ्या लघु पाटबंधारे विभाग, नागपूर यांच्याशी करारनामा करण्यात आला नसल्याची तक्रार पाणी बचाव संघर्ष समितीची आहे. ती रद्द झाल्याने, नव्याने पुन्हा उत्तम गाल्वाला परवानगी देवू नये आणि ती कायमची रद्द करावी, असे म्हणणे पाणी बचाव संघर्ष समितीचे आहे.येथून पाणी गेल्यास या परिसरात उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ होईल. येथील नागरिकांना, शेतकऱ्यांना, नळ योजना कोरड्या पडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. उत्तम गाल्वाला काम करण्यासाठी मनाई आणि शासनाने उत्तम गाल्वाची पाणी परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोकोचे आंदोलन केले आहे. यावेळी प्रा. दिवाकर गमे आणि मनोज रूपारेल यांच्यासह यावेळी समितीचे असंख्य कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक येथे उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वणा नदी पाणी बचाव समिती हिंगणघाट यांच्या ‘रास्ता रोको’ आंदोलनात गजू कुबडे, सुनील डोंगरे, राकेश शर्मा, प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, प्रफुल क्षीरसागर, राजू अरगुले, सुरेश मुंजेवार, अजय पोहणकर, प्रदीप डंभारे, छत्रपती वादाफळे, शशीकांत गिरी, विजय थोरात, महेश खडसे, शेखर साल्वे, विनोद कुंभारे, राजा पचोरी, तुषार हवाईकर, संजय बावणे, भारत पवार, रूपेश लाजूरकर, सुरेश बोदाडे, प्यारू अली, रहिम, संघर्ष समिती सदस्यांसह नागरिकांचा सहभाग होता.(तालुका प्रतिनिधी)
वणाच्या पाण्यावरून रास्ता रोको
By admin | Updated: January 30, 2016 02:24 IST