गांधी-विनोबा परिवाराची बदनामी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:15+5:30
नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी गोपुरी येथील सर्व सेवा संघाची जमीन खाजगी व्यक्तीला देण्यासाठी चर्मालयाची एतिहासिक वास्तू पाडण्यात आली. या परिसरातील ४० डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आली. हे कृत्य गंभीर असल्याची तक्रार जिल्हा सर्वोदय मंडळाकडे केली. माऊस्कर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा सर्वोदय मंडळाने १२ फेब्रुवारीला बैठक बोलावून या गंभीर प्रकरणाची दखल घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोपूरी परिसरातील सर्व सेवा संघाच्या जमिनी खाजगी लोकांच्या घशात खालण्याच्या प्रकरणाने जिल्ह्यातील गांधीवादी संतप्त झाले आहेत. या प्रकरणी सर्व सेवा संघाची भूमिका चूकीची असल्याचा मतप्रवाह सर्वत्र उमटला आहे. याच पार्श्वभूमीवर मातृ संस्था असलेल्या सर्व सेवा संघाचे वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाने कान टोचले असून गांधी-विनोबा परिवाराची बदनामी होईल, असे कृत्य करू नका असा सल्ला त्यांना दिला आहे.
नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी गोपुरी येथील सर्व सेवा संघाची जमीन खाजगी व्यक्तीला देण्यासाठी चर्मालयाची एतिहासिक वास्तू पाडण्यात आली. या परिसरातील ४० डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आली. हे कृत्य गंभीर असल्याची तक्रार जिल्हा सर्वोदय मंडळाकडे केली. माऊस्कर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा सर्वोदय मंडळाने १२ फेब्रुवारीला बैठक बोलावून या गंभीर प्रकरणाची दखल घेतली.
या बैठकीत गांधी-विनोबा परिवाराची बदनामी होऊ नये शिवाय सदर प्रकरणात स्नेह संबधनातून तोडगा काढण्याबाबत भूमिका घेण्याचे ठरले. तसेच सर्वसेवा संघाने नेमके काय कृत्य केले, याची माहिती घेण्याकरिता दामोधर उघडे व प्रमोद टाले या दोन सदस्यांची समिती नियुक्त करून त्यांच्याकडून गुरूवारी या प्रकरणाचा अहवाल मागविला. या अहवालात चर्मालयाची वास्तू व डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याचे सर्वोदय मंडळाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तोडफोडीची कारवाई स्थगीत करण्यात यावी. सर्व बाबींचा कायदेशीर निपटारा झाल्याशिवाय पुढे पाऊल उचलू नये, असे लेखी पत्राव्दारे जिल्हा सर्वोदय मंडळाने सर्वसेवा संघाला कळविले आहे. मातृ संस्था असल्यामुळे आपण या बाबीचा निश्चितपणे विचार करून गांधी व विनोबा परिवाराची बदनामी होणार नाही, यासाठी दक्षता घ्या, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. सर्वोदय मंडळाच्यावतीने अध्यक्ष मोहन खैरकार यांनी हे पत्र दिले आहे.
वनविभागाने तोडलेल्या झाडांची केली मोजणी
सर्व सेवा संघाने गोपूरी परिसरातील चर्मालय इमारत जमिनदोस्त करून या परिसरातील ४० वर अधिक झाडांची कत्तल केली. या प्रकरणी नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुरुवारी वनविभागाच्या तीन सदस्यीय समितीने मोक्का पाहणी करून लाकडाचे मोजमाप केले.
तसेच कुठलीही परवानगी न घेता तोडलेल्या झाडांची मोजणी केली. राऊंड आॅफीसर उमेश शिरपूरकर, वनरक्षक निलेश राऊत, धनराज मजरे आदी उपस्थित होते. त्यांनी लाकडाची मोजणी करून संपूर्ण माहिती गोळा केली. यावेळी माजी सरपंच बाळकृष्ण माऊस्कर, ग्रा.प. सदस्य रणजीत इवनाथे, पंकज काचोळे, सागर सबाने, अशांक कावळे उपस्थित होते. हे प्रकरण पुढे काय नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.