बळीराजाला पावसाची प्रतीक्षा : महागड्या बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीततळेगाव (टा़) : दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धुळपेरणीस प्रारंभ झाला आहे़ मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडते, असा समज आहे़ काही शेतकरी वेळेवर मजूर व बैलजोडी मिळत नाही म्हणूनही धुळपेरणी करतात़ सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी ‘पेरते व्हा’चा संदेश देत धुळपेरणी आटोपती घेतल्याचे दिसते़परिसरात ओलिताची सोय असल्यानेही शेतकरी मान्सूनपूर्व पेरणीवर अधिक भर देतात़ मागील वर्र्षी मृग नक्षत्रात पाऊस आल्याने कपाशी व सोयाबीनची पेरणी आटोपली होती; पण यंदा आठवडा लोटूनही पावसाचे संकेत नसल्याने काही शेतकऱ्यांनी धुळपेरणीस प्रारंभ केला आहे़ गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने नाल्याच्या काठावर शेत असलेल्या शेतकऱ्यांचे पीक खरडून गेले़ सोयाबीनसह रब्बी पिकालाही फटका बसला. शेतकऱ्यांनी उन्हाची तमा न बाळगता लग्नकार्य आटोपून मान्सूनपूर्व मशागतीची कामे पूर्ण केलीत़ सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धुळपेरणीसाठी सरसावले असले तरी भारनियमनामुळे तेही अशक्य होत आहे. पाऊस आल्यास घाई होऊ नये म्हणूनही शेतकरी धुळपेरणी करीत आहे. काही शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असताना ते धुळपेरणी करण्यास धजावत नाही तर काही कोरड्यामध्ये लावण करीत आहेत़ यावर्षी सोयाबीन बियाण्यांचे भाव वाढले असून उगवण शक्तीबाबत साशंकता आहे़ यामुळे बहुतांश शेतकरी कपाशीची लागवड करीत असल्याचे दिसते़ मागील वर्र्षी सोयाबीनला अंकुर फुटल्याने ३० किलोची बॅग २ हजार ५०० रुपयांवर मिळत आहे़ असे असले तरी बियाणे गुणवत्तापूर्ण नसल्याने शेतकऱ्यांना एक एकर शेतात ४० ते ४५ किलो बियाणे खर्ची घालावे लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप बँकेचे कर्ज न मिळाल्याने बियाणे खरेदी लांबली आहे़ मागील वर्षी उत्पन्ना घट झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. यामुळे अनेकांना कर्ज अदा करता आले नाही़ यंदा दागिने गहाण करून वा सावकाराकडून आणून कर्ज फेड करून नवीन कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे़ आजही अनेक शेतकरी कर्ज मंजुर होण्याच्या प्रतिक्षेत आहे.(वार्ताहर)
‘पेरते व्हा़़़धुळपेरणीला प्रारंभ’
By admin | Updated: June 15, 2014 23:41 IST