वर्धा : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी केंद्र शासनातर्फे प्राप्त झालेला निधी परत जाणार नाही. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च होईल, यादृष्टीने कामांचे नियोजन करण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना खा. रामदास तडस यांनी विभागप्रमुखांना केल्या. विकास भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा समिती सदस्य विलास कांबळे, समुद्रपूरच्या पंचाययत समिती सभापती नंदा साबळे, आर्वीच्या तारा ताडाम, सेलूच्या मंजूषा दुधबडे, कारंजाच्या संगिता खोडे, देवळीचे भगवान भरणे आणि हिंगणघाट पंचायत समितीचे संजय तपासे, सुचिता मडावी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा प्रमोदकुमार पवार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे आदींची उपस्थिती होती.बैठकीमध्ये केंद्राच्या जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा खा. तडस यांनी घेतला. त्यांनी केंद्रीय निधी प्राप्त विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावित. तसा अहवाल सादर करावा. सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत उर्वरित सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावीत. महावितरण ग्रामीण भागात प्राधान्याने वीज जोडणी करावी, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केल्यात.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रगतीचा आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांनी सादर करून जिल्ह्यात २६ कामे सुरू असून उर्वरित कामे करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा प्रगतीचा आढावा प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार यांनी सादर करून आज रोजी खर्च पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले.
केंद्राचा निधी मार्चपूर्वीच खर्च करा
By admin | Updated: February 19, 2016 02:21 IST