घोराड : तालुक्यात येत्या खरीप हंगामात कापसाच्या पेऱ्यात वाढ होणार असून सोयाबीनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचेही प्रमाण यंदा कमी असणार अशी शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत दिसत आहे.२०१३-१४ च्या खरीप हंगामात २०.८७१ हेक्टर च्या आसपास कापसाची लागवड तालुक्यात करण्यात आली होती. तर १९.००५ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला होता. पण गेल्या खरीप हंगामात पेरणी झाल्यापासूनच दमदार पावसाने लावलेल्या हजेरीचे रूपांतर अतिवृष्टी झाल्याने शेती खरडून निघाली. त्यामुळे पराटी पिकांची नासाडी झाली. तद्नंतर सोयाबीन कापणी व मळणीच्या वेळी आलेल्या सततच्या पावसाने सोयाबीन ओलेचिंब झाले. याचा फटका बसून भाव घसरले. त्यामुळे विविध कंपण्यानी सध्या विक्रीस आणलेली सोयाबीनची बियाणे महागली आहे. पण पेरल्यानंतर ती योग्य प्रकारे उगवतील का, याबाबत शेतकरी साशंक असून पराटी पेरण्याकडेच शेतकरी वर्गाचा कल दिसत आहे. यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या कारणाने नोयोजन कसे करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. पण गत वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे क्षेत्रात घटणार असून कापसाचे क्षेत्र वाढणार असे चित्र दिसत आहे. पीक कुठलेही असो पण निसर्गाने साथ द्यावी आणि पिकाला चांगला भाव मिलावा अशी आशा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहे.मृग नक्षत्र सुरू आहे. मात्र पाऊस न आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.(वार्ताहर)
सोयाबीनचा पेरा घटण्याचे संकेत
By admin | Updated: June 14, 2014 23:47 IST