प्रशांत हेलोंडे/ पराग मगर वर्धा पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्यात येतात. त्या साफ करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना त्यांच्याकडून या संदर्भात अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती आहे. नाल्या स्वच्छ करण्यासंदर्भात पालिकेत अद्याप कुठलीही सभा झाली नाही वा या विषयावर चर्चाही करण्यात आली नाही. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्धा शहरातून तीन मोठे नाले वाहत आहेत. शहरातील छोट्या नालीतील पाणी या मोठ्या नाल्यात येते. यामुळे या नाल्यातील कचरा उपसण्याची गरज आहे. यंदा जून महिन्याच्या प्रारंभीलाच मान्सून धडकणार असल्याचे संकेत वेध शाळेने दिले आहे. त्या अनुशंगाने पालिकेच्यावतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे क्रमाप्राप्त ठरते; मात्र वर्धा पालिकेच्यावतीने या संदर्भात साधी चर्चा करण्याचीही तसदी घेतली नाही. शहराच्या मध्यभागातून वाहत असलेल्या या नाल्याच्या बाजूला एक नव्हे दोन शाळा आहे. सध्या या नाल्यांमध्ये झुडपे वाढली असून प्लास्टिकचाही खच पहावयास मिळतो. या नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्यास ते शाळेत शिरण्याची शक्यता आहे. शिवाय याच नाल्याच्या शेजारी राणी दुर्गावतीनगर आहे. या नाल्यात पाणी अडल्यास ते परिसरातील घरांमध्ये शिरण्याची भीती वर्तविली जात आहे. यापूर्वी असा प्रकार शहरात घडला आहे. येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना रात्र उघड्यावर काढण्याची वेळ यापूर्वी आली आहे. या व्यतिरिक्त शहरात असलेल्या छोट्या नाल्याही तेवढ्याच धोक्याच्या आहेत. नागरिकांच्या घरांपासून वाहत असलेल्या या नाल्यांची पालिकेच्यावतीने स्वच्छता करण्यात येत नसल्याने त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे वास्तव आहे. या नाल्या तुंबल्या असल्याने रस्त्याने वाहत असलेले पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. याचा त्रास रहदारीस होवून पर्यायी वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे. यामुळे शहरातील नाल्यांचा उपसा पावसाळ्यापूर्वी होणे अत्यावश्यक आहे. असे असताना पालिकेच्यावतीने अद्यापपर्यंत कुठल्याही उपाययोजना आखण्यात आल्या नाही याचेच आश्चर्य. पालिकेत या विषयावर चर्चा करण्यासंदर्भात साध्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले नसल्याची माहिती आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पावसाचे दिवस जवळच आले आहे. यामुळे शहरातील नाल्यांचा उपसा करण्याची मागणी वर्धेकर करीत आहेत. नाल्यात औषधीचा कचरा; बऱ्याच ठिकाणी झाले अतिक्रमणशहरातील पाणी वाहून जाण्याकरिता तयार करण्यात आलेल्या नाल्यात येथील व्यवसायिक त्यांच्या दुकानातील कचरा टाकत आहेत. अदिती मेडिकल स्टोअर्सच्या शेजारी असलेल्या नालीत मोठ्या प्रमाणात औषधीचे रिकामे खोके टाकण्यात आले आहेत. ते नालीत तसेच पडून असल्याने नालीतून पाणी वाहण्याकरिता अडथळा होण्याची शक्यता आहे. शहरातील मालगुजारीपुरा येथून गेलेल्या नाल्यावर नागरिकांनी व व्यवसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमण केल्याने त्याचे रूपांतर नालीत झाले आहे. शिवाय यात कचरा टाकण्यात येत असल्याने पाणी तिथेच अडत असल्याचे दिसते आहे. यामुळे अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करीत नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या तुुंबलेल्याच
By admin | Updated: May 18, 2015 01:56 IST