पत्रकार परिषद : अनाथ मुलांचे करणार संगोपन, दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटपआर्वी : समाजातील गरजू आणि वंचितांंच्या दु:खावर मायेची फुंकर घालून त्यांना मदतीचा हात देऊन विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वंचित कुटुंबांची सेवा करण्याचा संकल्प आर्वीतील मदत फाऊंडेशन केला आहे. वर्धा नागरी बॅँकेचे अध्यक्ष अनिल जोशी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना सहकार्य करीत विविध उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी सांगत साडी दान योजना हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविणार असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिक पिशवीला विरोध करीत पर्यावरण संरक्षणासाठी आर्वीतील सर्व दुकानदारांना २५ हजार कापडी पिशव्या नि:शुल्क देण्यात येणार आहे. गरजू स्त्रियांना शिलाई मशीनही वाटण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजना गरजूपर्यंत पोहचण्यासाठी एकाच ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून गरजूंना थेट त्या योजनेचा लाभ देण्याचा उपक्रम मदत फाऊंडेशनद्वारे राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. गरजूंना मोफत औषधी वाटप, पर्यावरण बचावासाठी फळपिकांच्या बिया संकलित करून त्या आर्वी परिसरातील जंगलात लावणे हा उपक्रमही मदत द्वारे राबविला जाणार आहे. यावेळी मदत फाऊंडेशनच्या वतीने आर्वीतील मायबाई वॉर्डातील आई, वडिलांचे छत्र हरविलेल्या जान्हवी अनिल तेलंगे, आशुतोष तेलंग या दोन अनाथ चिमुकल्यांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपण करण्याचा निर्धार मदत फाऊंडेशनने व्यक्त केला. तसेच गरजूंना मदत करण्यासाठी समाजाने समोर येण्याचे आवाहनही करण्यात आले. पत्रपरिषदेत मदत फाऊंडेशनचे अनिल जोशी व कविता जोशी यांनी देहदानाच्या संकल्प जाहीर केला. ‘मदत’ फाऊंडेशनची सामाजिक भूमिका प्रा. छोटू देशमुख यांनी विषद केली. पत्रपरिषदेला दिवाकर भेदरकर, जितू पाटणी, श्याम काळे, प्रा. नितीन बोडखे, विजय अजमिरे, कैसरभाई, डॉ. अनिता भुतडा, लक्ष्मीकांत साखरे आदींची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)
‘मदत’ने घेतला वंचितांच्या सेवेचा संकल्प
By admin | Updated: April 16, 2016 01:39 IST