पुलगाव : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी मुसळधार पाऊस तर कधी पावसाची प्रतीक्षा या संकटातून सतत शेतकऱ्यांना जावे लागत आहे. यामुळे उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसतो़ आता पुन्हा निसर्गाने शेतकऱ्यावर घाला घातला असून वादळी पावसामुळे चना, तूर, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने शेतकरी हादरला आहे़शेतकऱ्यांच्या शेतात असलेले गहू, चना हे पीक वादळ व पावसामुळे भुईसपाट झाले असून कापूस ओला झाला़ शेतात ठेवलेल्या तुरीच्या गंज्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़ गत दोन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळी वातावरण असले तरी पावसाचे चिन्ह दिसत नव्हते; पण मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला़ यामुळे शहर परिसरातील शेतातील गहू, चना या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे वाघोली (बिरे) येथील शेतकरी विनोद बिरे यांनी सांगितले. आपटी, वाघोली, दहेगाव (धांदे) या परिसरातील शेतातील गहू व चना ही उभी पिके वादळी पावसाने शेतात झोपली. यामुळे शेकडो एकरातील पिकांचे नुकसान झाले़ शहरात गजानन महाराज मंदिरातील भागवत सप्ताहाच्या मंडपाचे नुकसान झाले़ विजयगोपाल येथील पंचकल्याण महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या अयोध्यानगरी मंडपालाही वादळी पावसाचा फटका बसला़(लोकमत न्यूज नेटवर्क)चांगल्या दिवसाचे स्वप्न ठरतेय दिवास्वप्नघोराड - शासनाने बळीराजाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले असले तरी खरीपानंतर रबी हंगामावरही अस्मानी संकट कोसळल्याने हे स्वप्न दिवास्वप्नच ठरणार असल्याचे दिसते़खरीप हंगामातील आपत्तीचा गांजर निधीचे वाटप सुरू असताना मंगळवारी वादळी वाऱ्यासह आलेला पाऊस गहू, चना व तुरीचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरला. पांढऱ्या सोन्याच्या भाववाढीकडे शासनाने पाठ फिरविली. सोयाबीनला अत्यल्प भाव, तुरीला समाधानकारक दर; पण उत्पादनात घट यामुळे लागलेला खर्चही निघाला नाही. तोच रबीच्या हंगामाला सामोरे गेलेल्या शेतकऱ्यांच्या हातात येणारा वर्षभरासाठी लागणारा गहू नेस्तनाबूत झाला असल्याने लागणारे अन्नच हातचे गेले. यामुळे हताश होण्याची वेळ आली. या नुकसानीचे सर्वेक्षण होणार आणि २०० ते ५०० रुपयांची तुटपुंजी मदत मिळणाऱ या प्रकाराने चांगले दिवस येतील काय, खिशात ५०० च्या हिरव्या नोटा दिसतील काय, हे कोडेच आहे़ या कोड्याची उकल शासन कशी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यामंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी पावसाने काही भागात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ संपूर्ण जिल्ह्यात गहू, तूर, संत्रा पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे़यावर्षी खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती होती तर रबी हंगामातील गहू, चना, तूर, संत्रा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांचा तातडीने सर्व्हे करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी जि़प़ सदस्य दिलीप अग्रवाल यांनी केली आहे़ याबाबत जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़सेवाग्राम - मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी पावसामुळे सेवाग्राम ते हमदापूर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने याचा सर्व्हे करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मनसेचे सेलू तालुका उपाध्यक्ष अतुल पन्नासे यांनी केली आहे.दिवसा लख्ख प्रकाश होता. आभाळाचे कुठलेच चिन्ह नव्हते. शेतात कापूस, चना, तुरीच्या पेट्या आणि गहू असे पीक होते़ अकस्मात वारा, पाऊस आणि विजेचा कडकडाट यामुळे नागरिकासह शेतकरी हादरले़ गहू झोपला, कापूस व तुरीच्या पेट्या ओल्या झाल्या. आधीच शेतकरी आर्थिक संकटात असताना यात अवकाळी वादळी पावसाची पर पडली़ बहुसंख्य शेतकऱ्यांचे तुरीचे कुटारही पावसात सापडल्याने नुकसान झाले. सेलू तालुक्यात चानकी, कोपरा, देऊळगाव, हमदापूर, वघाळा, तुळजापूर, खडका, जयपूर, हिंगणी, नानबर्डी, चारमंडळ आदी गावांत सर्वेक्षणाची मागणी होत आहे़ तातडीची मदत करण्याची मागणी पन्नासे यांनी केली आहे. शेतातील गहू झोपला असून जनावरांचा चारा ओला झाला़ आश्रम परिसरातील अशोक गिरी, पवन गणवार व सचिन हुडे यांचे दूरदर्शन संच बिघडले. पाहणी प्रसंगी राजेश बावणे, मोहन वाहुरकर, अमोल कडू, ढुमणे आदी उपस्थित होते.
वादळी पावसामुळे रबीतील पिकांनाही फटका
By admin | Updated: February 13, 2015 00:33 IST