सेवाग्राम : जग सुंदर आहे. याकडे पाहण्याची दृष्टी ही सकारात्मक असायला पाहिजे. यातूनच सृजनात्मक गुणांचा विकास घडून येतो. चाकोरीबद्ध शिक्षण प्रणाली असल्याने खरे शिक्षण आपल्याला वातावरणातून आणि परिस्थितीतून प्राप्त होते. व्यक्ती स्वातंत्र्यता आपण जतन करताना सन्मान जोपासला पाहिजे, असे विचार राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजा अवसक यांनी शिबिराच्या समारोपप्रसंगी केले. १२ तास वेगवेगळ्या वातावरणातील संस्कारातील ही बालके १५ दिवस सोबत राहून जे शिकले ते कुठल्याही शाळेत हे ज्ञान त्यांना मिळणार नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी जे शिक्षण मिळते ते शिबिरातून पालकांनो स्पर्धेतून बाहेर पडा आणि आवडीच्या शिक्षणाला प्राधान्य द्या असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले. नई तालीम परिसरातील शांती भवन मध्ये प्राथमिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजा अवसक तर अतिथी म्हणून नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, डॉ. विभा गुप्ता व जि.प.सदस्य सुनिता ढवळे उपस्थित होत्या. उपस्थितांनी इ.डब्लु. आर्य नायकम, आशादेवी व पू. सानेगुरुजी यांच्या प्रतिमेला सूतमाळा अर्पण केली. ‘मन के विना से करते हे स्वागत’ या स्वागत गीत व पुष्प गुच्छाने मान्यवरांचे स्वागत केले. राजा अवसक म्हणाले, आजची मुलं हुशार आहेत. सर्व साधने त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. टी.व्ही.मुळे जग जवळ आलं पण घरातील संवाद मात्र कमी झाला. खेळण्याच्या, संवादाच्या वयातच ही मुलं पारखी झाली आणि हिंसात्मक दृष्ट्यातून चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या. फसव्या वातावरणात आपण जगत असून स्पर्धेच्या भयाने जीव घुसमटतो. स्पर्धा हा पशुंचा गुण पण आता तो मानवांचा बनला आहे. थोरा मोठ्यांच्या गोष्टी गीतांच्या माध्यमातून आणि महात्मा यांचा विचार अंगीकारा. यावेळी उपस्थित अतिथींनीही मार्गदर्शन केले. मठकरांनी स्वदेशी वस्तू वापराव्या अन्न,पाणी यांचा योग्य वापर करावा आणि प्रत्येकाखादी वस्त्र असावे असा आग्रह धरला. आदित्य अक्षद सोमनाथे, ओम काळे, राधिका, क्षितीज या बालकांनी तसेच पालक विजय धुमाळे यांनी मनोगत व्यक्त केले. समूह गीत व नाटके सादर करण्यात आली. ‘खेळ मांडला’ या ओम काळेच्या गीताने टाळया घेतल्या. योग, व्यायाम, स्वत:चे काम स्वत करणे, संगीत, गाणी, चित्रकला, कागद काम, हसत खेळत गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी व्यवस्थीत शिकणे, बोलणे, मनातील भीती घालविणे, सामान्य व्यवहार, मैदानी खेळ व कथा कथन असा दैनिक कार्यक्रम शिबिराचा होता. यावेळी गजेंद्र सुरकार, हरिष इथापे, डॉ. उल्हास जाजू, डॉ. शिवचरण ठाकूर, संजय आत्राम, गजानन अंबुलकर, अविनाश सोमनाथे, शरद ताकसांडे आदींनी मार्गदर्शन केले. ११ ते १३ या वयोगटातील ३७ मुल मुली सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन डॉ. सुगन बरंठ यांनी केले. संचालन नितीन पाटील यांनी तर आभार पवन यांनी मानले. (वार्ताहर)
आवडीच्या शिक्षणाला प्राधान्य द्या
By admin | Updated: May 27, 2014 01:04 IST