तळेगाव (टा़) : वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. दोन वर्षांपूर्वी एकुर्लीपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या तळेगाव फाट्यापर्यंत याच रस्त्याचे पक्के बांधकाम झाले. यामुळे गावातील अंतर्गत रस्तावरुन काही घरामध्ये पावसाळ्याचे पाणी शिरते. मुख्य रस्ता असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते झेंडा चौकापर्यंत हा मार्ग सीमेंटचा होणार असल्याने काही वर्षांपूर्वी उद्घाटन झाले होते. बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून राहिले. कालांतराने सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले, पण तेही अर्थवटच राहिले. राजकीय मतभेद आणि गावात अतिक्रमणाचा बडगा आल्याने या रस्त्याचे काम थांबले. मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने सध्या एका वाहनाशिवाय दुसरे वाहन या रस्त्यावरून निघत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविले. अतिक्रमणात भिंतीच्या विटा व साहित्य जमा झाले. आम्ही कचरा उचलतो असे नागरिकांनी सांगितल्यानंतरही प्रशासनाने मलबा उचलला नाही. त्यामुळे दगडमाती नालीमध्ये जवळपास दोन महिने पडून राहिले. अखेर पावसाळ्याचे पाणी नालीने जावे, यासाठी ग्रामपंचायतने युध्दपातवळीवर नाली उपसण्याचे काम केले. आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होवून आचार संहिताही संपल्या आहे. अतिक्रमणही हटले आहे. मग राहिलेल्या सिमेंट रस्त्याचे काम केव्हा होईल, या प्रतीक्षेत गावकरी आहे. सिमेंट रस्ता बांधकामात अनेक वेळा राजकीय मतभेद आडवे आल्याने या काम थांबले असावे, असा सूर गावकऱ्यांमध्ये आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
राजकीय मतभेदामुळे सिमेंट रस्ता रखडला
By admin | Updated: November 12, 2014 22:49 IST