जामखुटा येथील घटना आर्वी : तालुक्यातील जामखुटा येथील एका नऊ वर्षीय चिमुकलीचे गावातील एका युवकाने अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोप असलेल्या युवकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. पोलीस सुत्रानुसार, येथील पोलीस ठाण्यात दादाराव माणिक कोहळे (३७) रा. जामखुटा यांनी त्याची भाची राधिका उपास उईके (९) रा. जामखुटा आर्वी हिला आरोपी चंद्रशेखर उईके रा. जामखुटा याने अपहरण करून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. तक्रारीवरून भादंविच्या कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर युवक चिमुकलीसह आष्टी तालुक्यातील किन्हीमोळी या गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी प्रभारी ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात जमादार तोडसाम, गजानन लामसे, निघोट, मडावी, गव्हाणे, मसराम, गेडाम या पथकाने गावात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी अपहृत मुलीला ताब्यात घेतले आहे. त्याने तिचे अपहरण का केले, याचा खुलासा होणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)
‘त्या’ अपहरण प्रकरणी एकाला अटक
By admin | Updated: May 28, 2016 02:06 IST