राजकीय पाठबळ : गरिबांचे धान्य काळ्या बाजारातवर्धा : गोरगरीब नागरिक अर्धपोटी राहू नये यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत अल्पदारात धान्य देण्याची योजना अस्तित्वात आणली; पण ही वितरण प्रणाली सध्या वादातीत ठरत आहे. गोरगरीबांच्या धान्याची उचल करून काळाबाजार करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. देवळी तालुक्यातील निमसडा येथेही ग्रामस्थांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असाच प्रकार वर्धा तालुक्यातही अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. धान्य दुकानदारामार्फत दारिद्र्य रेषेखालील व एपीएल धारक नागरिकांना अल्पदराने धान्य पुरविण्याची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारावर असते; पण देवळी तालुक्यातील निमसडा येथील ग्रामस्थांना रेशन दुकानातून स्वस्त धान्य मिळत नसल्याची ओरड होत आहे. गावातील राजकीय पुढाऱ्याच्या पाठबळामुळे आलेला धान्यसाठा ग्राहकांना न देता जादा दराने काळ्या बाजारात विकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतची लेखी तक्रारही ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. बीपीएल व एपीएल धारकांना माल आलाच नाही, असे सांगत ग्राहकांना आल्या पावली परत केले जाते. काहींना निकृष्ट धान्य दिले जाते. जनावरांनाही खाण्यायोग्य नसलेले धान्य ग्रामस्थांना पुरविले जाते. स्वस्त धान्य दुकानात साखर मिळते, हे माहितीच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांना धान्य मिळत नसल्याने उचल केलेला माल जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वस्त धान्य दुकानदार दिलीप पाटील यांना परिसरातील राजकीय पुढाऱ्याचे पाठबळ असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. एक वर्षापासून धान्य मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदार जाधव यांना सह्यांसह दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी भोयर, मरस्कोल्हे, भास्कर, वाळके, येंडे, चाफले, पांडे तसेच महिला उपस्थित होत्या.(तालुका प्रतिनिधी)
निमसडा ग्रामस्थ स्वस्त धान्यापासून वंचित
By admin | Updated: February 26, 2016 02:41 IST