वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या असलेल्या तुटवड्यामुळे बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यावर लगाम लावण्याकरिता जिल्ह्यात एकूण नऊ पथक तयार करण्यात आले असून ते पथक जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. यात एक जिल्हास्तरावर तर आठ पथके तालुका स्तरावर कार्यरत राहणार आहेत. खरिपात कापाशीचा पेरा वाढणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात कपाशिच्या बियाण्यांची एकूण ८.२१ लाख पाकीटे आवश्यक आहेत. असे असले तरी जिल्ह्यात आजच्या घडीला अर्धेच बियाणे उपलब्ध आहे. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यात बियाणे येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडाही यंदाही जानवणार आहे. यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या घरी असलेल्या बियाण्यांचा वापर करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. जिल्ह्यात नियोजित असलेल्या पेर्याकरिता १.0८ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. या दोन्ही पिकांच्या बियाण्यांचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यातून होणारा काळाबाजार रोखण्याकरिता जिल्ह्यात नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शिवाय शेतकर्यांना कुठे कोणती अडचण निर्माण झाल्यास त्या कृषी विभागाला पुरविण्याकरिता एक तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आली आहे. या केंद्रावर संपर्क साधत शेतकर्यांनी त्यांच्या तक्रारी सादर करण्याच्या सूचना आहेत. (प्रतिनिधी)
नऊ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर करडी नजर
By admin | Updated: May 31, 2014 23:40 IST